म. टा. प्रतिनिधी, नाशिक
काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये शहीद झालेले भरवस-दहेगावचे (ता. निफाड) जवान सागर माधव चौधरी (वय २८) यांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईला शनिवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहाला येणार आहे. त्यांच्यावर भरवस येथे आज (दि. २९) सकाळी ११ वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शेतकरी कुटुंबातील सागरच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. कुटुंबाची भेट घेऊन २३ सप्टेंबर रोजी सागर रवाना झाले होते. त्याच्या पाच दिवसांनंतर २८ सप्टेंबर रोजी ते शहीद झाल्याची माहिती धडकल्याने गावावर शोककळा पसरली. २७ एप्रिल २०१६ रोजी त्यांचा विवाह झाला. सागर यांच्या मागे आईवडील, पत्नी, एक वर्षाचा मुलगा शौर्य, दोन विवाहित बहिणी, तीन चुलते असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबातील वीरपुत्र
भरवस-दहेगाव या हजार लोकवस्तीच्या गावात एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात सागरचा जन्म झाला. त्यांना दोन एकर शेती आहे. चौथीपर्यंत भरवस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि त्यानंतर विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वीपर्यंतचे शिक्षण सागरने घेतले. शालेय जीवनापासूनच लष्करी सेवेत दाखल होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. २३ मार्च २०१२ मध्ये त्याची सैन्यात निवड झाली होती.