म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडी येथे गजानन दीपक गावित (वय २८, रा. बजरंगवाडी) या तरुणाच्या झालेल्या हत्येप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दोघा संशयितांना अटक केली.
जुन्या भांडणामुळेच गावितची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
मयूर विलास निंबाळकर (२७, गणराज कॉम्पलेक्स, हॅपी होम कॉलनी) आणि शेखर कैलास काळे (२३, महादेव मंदिराजवळ, बजरंगवाडी) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. जुन्या भांडणाच्या कारणातून रविवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपींनी गावितवर हल्ला केला होता. धारदार शस्त्रांचा वार झाल्याने गजाननचा जागेवर मृत्यू झाला. या दोघांच्या अटकेबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले, की संशयित आरोपी निंबाळकर हा ब्रोकर असून, शेखर काळे हा शिक्षण घेतो. हत्येच्या घटनेनंतर संशयित फरारी झाले होते. या दोघांच्या तपासासाठी पोलिसांनी पथके तयारी केली. पोलिस त्यांच्या मागावर असताना निंबाळकर हा सोमवारी रात्री फेम सिनेमा सिग्नल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. यानंतर क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने मनमाडमधील नांदगाव चौफुली येथून काळेला पकडले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, अधिक तपास सुरू असल्याचे मुंबई नाका पोलिसांनी स्पष्ट केले.