अ‍ॅपशहर

‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’; शाळेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याने दरेवाडी वस्तीवरील ग्रामस्थांनी ४३ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नाशिक गाठले. विद्यार्थ्यांच्या हाती शेळ्या देऊन ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून टाकत प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 12 Oct 2022, 1:32 pm
नाशिक : बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क सक्तीचा असताना इगतपुरी तालुक्यात बालकांची शाळाच बंद करण्याचा सरकारी फतवा काढण्यात आला. या विरोधात विद्यार्थी व पालकांनी आवाज उठवून थेट नाशिक जिल्हा परिषदेवरच धडक दिली. ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणा देत ४३ विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. गावाहून शेळ्या सोबत घेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे नमते घेऊन अखेरीस सरकारी बाबूंना शाळा पूर्ववत सुरू ठेवणे भाग पाडले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nashik student
‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’; शाळेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन


इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे बांधकाम सन २०१८ मध्ये पूर्णत्वास गेल्यानंतर येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. यातील सुमारे ४० कुटुंबांनी स्थलांतरीत होण्यास नकार देत प्रकल्पानजीकच वस्ती केली. एक किलोमीटरच्या परिघातील जिल्हा परिषदेच्या दोन अधिकृत शाळांत या वस्तीवरील बालकांना समाविष्ट करावे, जेणेकरून प्रयोगशील शिक्षकांचा या विद्यार्थ्यांना लाभ होईल, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या होत्या. या वस्तुस्थितीचा अहवालदेखील त्यांच्या स्तरावरून जिल्हा परिषदेस देण्यात आला होता. त्यानुसार निवारा शेडमधील पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा १३ सप्टेंबर २०२२ पासून बंद केली होती. शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याने दरेवाडी वस्तीवरील ग्रामस्थांनी ४३ विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नाशिक गाठले. विद्यार्थ्यांच्या हाती शेळ्या देऊन ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून टाकत प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. प्राथमिक शिक्षणाधिकारी कनोज यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केल्यांनतर शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

...

विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तूर्तास शाळा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहे. एका शिक्षकाची नियुक्तीही करण्यात येणार आहे.

- भास्कर कनोज, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद

...

धरणाच्या डाव्या तीरावर आमची सुमारे ४० कुटुंब निवासी आहेत. मजुरीसाठी आम्ही घरापासून दूर असतो. या स्थितीत मुलांना दूरच्या शाळेत पाठविणे शक्य नाही. नजीकची शाळा बंद करणे अन्यायकारक आहे.

- साईनाथ गावंडा, सामाजिक कार्यकर्ता

....

आम्ही राहतो तिथून सध्याची शाळा जवळ पडते. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहायला हवे. दूरच्या शाळेत आम्हाला जाता येणार नाही.

- निशा गावंडे, विद्यार्थिनी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज