म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक
जुने नाशिकच्या प्रभाग २६ मधील भीमवाडीतील जवाहारलाल नेहरू घरकुल योजनेतील सावळा गोंधळामुळे लाभार्थी नरक यातनेच्या चक्रव्युहात अडकले आहेत. अनेक वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही घरकुल योजनेतील इमारतींचे बांधकाम अपूर्ण असूनही इमारतींना क्रमांक देण्याची लगीनघाई प्रशासनाने सुरू केली आहे. त्यात भीमवाडी घरकुल योजनेत सहा बिल्डिंगचा प्रकल्प असताना एका बिल्डिंगला ए ६ असा क्रमांक दिल्याने ए१ ते ए५ बिल्डिंग गेल्या कुठे? असा प्रश्न लाभार्थींना सतावेत आहे. त्यातच योजनेची घरेही मिळेना व स्थालंतरीत ठिकाणी मूलभूत सोयी सुविधाही असा दुहेरी संकटात लाभार्थी सापडले आहेत.
ए ६ बिल्डिंगचेही काम अपूर्णाअवस्थेत असून, योजनेतील घरे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात देऊ असे महापालिकेने सांगितले होते. मात्र अद्यापही घरकुलाचा ताबा अद्याप लाभार्थींना मिळालेला नाही. सहा वर्षापासून लाभार्थी घराच्या प्रतीक्षेत असून, सोयी सुविधेच्या वनवा असलेल्या स्थलांतरीत ठिकाणी त्यांना रहावे लागत आहे. घरेही मिळेना व स्थालंतरीत ठिकाणी मूलभूत सोयी सुविधाही असा दुहेरी संकटात लाभार्थी सापडले आहेत.
भीमवाडीत उघड्यावरील गटारींचे घाणपाणी थेट घरात घुसते. पावसाळ्यात तर तुंबलेल्या गटारी ओसाडून वाहतात. त्यातून परिसरात रोगराई पसरली आहे. सोयी सुविधा असलेल्या पक्के घरे मिळण्याची स्वप्न बाळगून लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका प्रशासन घरकुल योजनेतील घरे वाटपासाठी कधी लॉटरीची सोडत काढून तर कधी अपूर्णाअवस्थेतील इमारतींना क्रमांक देऊन छळत असल्याचा आरोप लाभार्थींनी केला आहे. भीमवाडीत स्थालंतरीत ठिकाणी सांडपाण्याची व गटारीची सोय नसल्याने तुंबलेल्या गटारींच्या पाण्यात राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. सहा वर्षांपासून सुरू असलेले घरकुलाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.