म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण ७१ लक्ष ५४ हजार ७३८ एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच तीन कोटी आठ लाख ४४ हजार ७६ नागरिकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ दिला जावा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भुजबळ यांनी संवाद साधला. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. यावेळी सचिव संजय खंदारे, शिधापत्रिका नियंत्रक कैलास पगारे, सहसचिव सतीश सुपे आदी उपस्थित होते. एपीएलमधील (केशरी) ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच १४ जिल्ह्यांतील शेतकरी योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, अशांची संख्या ७१ लाख ५४ हजार ७३८ एवढी आहे. या लाभार्थ्यांना सद्य:स्थितीत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ दिला जात नाही. त्यांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत केशरी कार्डधारकांना ९२ हजार ५३२ मेट्रिक टन गहू व ६१ हजार ६८८ मेट्रिक टन तांदळाचे वाटप केले जाणार आहे. गहू आठ रुपये प्रतिकिलो व तांदूळ १२ रुपये प्रतिकिलो दराने दिला जाणार आहे. प्रतिमाह प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ याप्रमाणे पाच किलो अन्नधान्य मे आणि जून महिन्यात मिळणार आहे.