संकटसमयी मदतीचा हात पुढे करणे तशी ही सर्वच धर्मांची शिकवण. परंतु, प्रत्यक्षात त्याचे सर्वच पालन करतीलच, असे नाही. करोनाचे विघ्न बघता बघता आपल्या देशात अन् अंगणातही येऊन ठेपल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. सर्व देशवासियांना या विघ्नातून वाचविण्यासाठी देशपातळीवर घेतलेला हा निर्णय उचितच. परंतु, यामुळे स्थानिक पातळीवर वेगळ्याच समस्या उद्भवल्या.
रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यापुढे दोनवेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली. संपूर्ण कुटूंब कसे पोसायचे या प्रश्नाने त्यांची चिंता वाढविली. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला तर संचारबंदीमुळे घरातच बंदिस्त होण्याची वेळ आली. घरातले तिखटमीठ दोनचार दिवस पुरले. त्यानंतर मात्र उपासमार होण्याची वेळ आली. प्रशासन, पोलिस, आरोग्य आणि वैद्यकीय विभाग करोनाचे संकट परतवून लावण्यासाठी एकीकडे जीवाची बाजी लावून दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत होता, तर दुसरीकडे या गोरगरीब लोकांच्या पोटाचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. प्रशासनाची अवस्था तर 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशीच काहीशी झालेली. सरकारतर्फे मोफत व पुरेसे धान्य स्वस्त धान्य दुकानांतून गोरगरीब जनतेला पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हातात पडण्यास काही दिवसांचा कालावधी नक्कीच लागणार होता. या बिकट परिस्थितीत शहरातील दानशूर नागरिक, सेवाभावी संस्था, कंपन्या, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, लोकप्रतिनिधी असे सर्वजण या भुकेल्यांच्या क्षुधाशांतीसाठी पुढे आले. शहरभर या दात्यांनी काही वेळात जेवण, शिधा या स्वरुपात गरजूंच्या दारात आपले दान पोहचते केले. या दात्यांत सर्व धर्मियांचा समावेश होता. २४ मार्चपासून संपूर्ण शहर व ग्रामीण भागातदेखील दातृत्वाचा मोहर बहरला आहे.
या दातृत्वाच्या लढ्यात शीख समाजबांधव देखील मागे नसल्याचे ठळकपणे दिसून आले. खरे बघता विविध ठिकाणच्या गुरुद्वारांतून लंगरच्या माध्यमातून शीख समाजबांधवांचा अन्नदानाचा यज्ञ वर्षभर पेटताच असतो. कुणाही भुकेल्या पांथस्थासाठी क्षुधाशांतीचे हक्काचे ठिकाण म्हणजे गुरुद्वारा. लंगरमधून एखादा भुकेला पांथस्थ कधी उपाशीपोटी माघारी गेल्याचे ऐकिवात नाही. दररोजच्या कमाईतील ठराविक हिस्सा हा अनाथ, गोरगरीब, भुकेले, बेघरांसाठी आनंदाने बाजूला काढून ठेवणाऱ्या शीख समाजबांधवांनी करोनाच्या लढाईत आजवर रंजल्या-गांजल्यांची भूक भागवून मोठी मानवसेवा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात शीख समाजबांधवांनी जणू काही आपल्या घरातील तिजोरीच उघडली आहे. नाशिकरोड गुरुद्वारा साहिब कमिटी, देवळाली कॅम्प गुरुद्वारा साहिब कमिटी, शिंगाडा तलाव गुरुद्वारा साहिब कमिटी, पंचवटी सिंग सभा गुरुद्वारा साहिब कमिटी, गुरुनानक मिशन, अमृत व्हिला कमिटी गुरुद्वारा साहिब, नाशिकरोड या विविध गुरुद्वारा समित्यांनी संपूर्ण शहरातील भुकेल्यांची भूक भागेल असाच अन्नदानाचा यज्ञ मांडला आहे. विशेष म्हणजे त्यात किंचित खंड पडू दिला नाही. त्यांच्या या मानवसेवेच्या कार्यात हेल्पिंग हॅण्ड्स, रॉबिनहूड या सेवाभावी संस्थादेखील सहभागी झाल्या आहेत.
शीख समाजबांधवांकडून गुरुद्वारात वर्षभर दर रविवारी लंगरचे आयोजन केले जाते. नाशिकरोड, पंचवटी, हिरावाडी, देवळाली कॅम्प, शिंगाडा तलाव, नारायण धाम, इगतपुरी या ठिकाणच्या गुरुद्वारांतून सुमारे साडेपाच हजार गरीब व गरजू नागरिकांना अन्नदान केले जाते. आज करोनाच्या संकटात शीख समाज बांधवांकडून आपल्या दातृत्वात तब्बल सात पटींनी वाढ केली असून या सर्व गुरुद्वारा आणि सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन एका दिवसाला ५ हजार ४७० भुकेल्यांना अन्नदान केले जात आहे. नाशिकरोड येथे मातोश्री वृद्धाश्रमात २०, रेल्वे गुड्स लेबरसाठी ४००, हेल्पिंग हॅण्ड्सतर्फे ४५०, गुरुद्वारा येथे ३५० तर रॉबिन हूडतर्फे ४५० असे एकूण १६७० गरजू नागरिकांना दररोज जेवण दिले जात आहे. देवळाली कॅम्प येथेही रॉबिनहूडतर्फे ७००, स्थानिक देवळालीत १००, रोटरी ४० तर देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे १० असे दररोज ८५० गरजूंना जेवण दिले जात आहे. शिंगाडा तलाव गुरुद्वारामार्फात ७५०, नारायण धाममार्फत ८००, हिरावाडी येथील गुरुद्वारातून ५००, पंचवटी गुरुद्वारातून ६००, इगतपुरी येथे ३०० नागरिकांना जेवण पुरवून शीख समाजबांधवांनी दातृत्वाचा अनोखा आदर्श उभा केला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीदेखील या अन्नदानाची दखल घेत शीख बांधवांच्या दातृत्वाचे कौतुक लेखी स्वरुपात नाशिकरोड येथील गुरुद्वारा साहिब कमिटीकडे आवर्जून कळविले आहे, यातच या अन्नदानाचे मोठेपण सिद्ध होते.
आजूबाजूच्या पाड्यांतही मदत
तपोवनरोड, टाकळी रोड, जोशी वाडा, देवळाली गाव, दूध बाजार, सिन्नर फाटा, पाथर्डी फाटा, जत्रा हॉटेल, कॅनॉल रोड आदी शहरी भागातील ठिकाणांसह शीख बांधवांना आजूबाजूच्या काही आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवांच्या पोटातील भुकेचा हुंकारदेखील ऐकू आल्याने या शीख बांधवांनी त्यांच्यापर्यंतही अन्नदानाचा हात वाढवला आहे. प्रत्येक गुरुद्वारा साहिब कमिटीद्वारे मिळेल ती जबाबदारी शहरातील प्रत्येक शीख समाजबांधव आपल्या खांद्यावर घेऊन ती प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने अनाथ, बेघर, गरजूंवर भुकेले राहण्याची वेळ टळली आहे. ही समाजसेवा शीख समाजबांधवांनी प्रसिद्धीपासून चार हात दूर ठेवली आहे. या पुण्याच्या कामाचे त्यांनी कधी भांडवलही केले नाही. गुरुग्रंथसाहिबमधून मिळालेली मानवसेवेची शिकवण अनुसरणे, त्याचे पालन केवळ स्वधर्मियांपुरतेच मर्यादित न ठेवणे हा सारासार विचार त्यांच्या दररोजच्या कृतीतून व्यक्त होत आहे. 'अन्नदाता सुखी भवः' या सुभाषितासह त्यांच्या या मानवसेवेला सलाम.
- शब्दांकन - नवनाथ वाघचौरे