म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अखंड सौभाग्य आणि पतीच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करीत हरतालिका व्रत केले जाते. आज, बुधवारी हरतालिका व्रताची पूजा करण्यात येणार आहे. सूर्योदयापासून ते मध्यान्हापर्यंत हरतालिकेच्या पूजा विधीचा मुहूर्त आहे. हरतालिकेचे पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी केली. पत्री, फुले, सुपारी आणि फळे खरेदी करण्यासाठी मेनरोड, गोदावरी पटांगण परिसरात महिलांची लगबग दिसून आली.
या व्रताच्या पूजा विधीत हिरव्या बांगड्या, खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड, नारळ, केळी व इतर फळांचे महत्त्व आहे. तसेच विड्याची पाने, कापसाची वस्त्रे व वाती, जानवे, पंचामृत, अक्षता पूजा विधीसाठी लागतात. चाफा, केवडा, बकुळ, कमळ, शेवंती, मोगरा या फुलांसोबत अशोक, आवळी, दुर्वा, कन्हेर, कदंब, ब्राह्मी, आघाडा, बेल या पत्री पूजा विधी करताना वाहिल्या जातात. या सर्व साहित्याची विक्री मंगळवारी सकाळपासून मुख्य बाजारपेठेत केली गेली. महिलांनी सकाळी नऊ वाजेपासूनच हरतालिकेच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. सायंकाळी महिलांचा ओघ अधिक वाढला होता. पत्री, हिरव्या बांगड्या, सुपारी, हळद यांची किंमत दहा रूपये तर पाच फळांची किंमत तीस रुपये होती. कर्दळीची फुले व पाने पंधरा रुपयांना होती.
असे करा व्रत...
हरतालिका व्रताची देवता शंकर व पार्वती आहे. दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती देवी असल्याने शंकर आणि पार्वतीची पूजा करून तिच्याजवळ पतीच्या उदंड आयुष्य व आरोग्याची मागणी करायची करते. सौभाग्य अखंड रहावे, ही प्रार्थना करण्यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. चांगला पती मिळावा म्हणून मुलीही हरतालिकेचे व्रत करतात. सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळेत हरतालिकेची पूजा केली जाते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे हे व्रत पार्वतीने शंकरासाठी केले होते. या व्रताचा उपवास गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडण्यात येतो. शंकराच्या मंदिरात किंवा वाळूचे शिवलिंग तयार करून हरतालिकेची पूजा करण्याचे अध्यात्मिक शास्त्र आहे. चतुर्थीला शिवलिंगाची उत्तरपूजा करताना दहीभाताचा नैवेद्य दाखवावा, अशी माहिती पुरोहित अमोल किरपेकर यांनी दिली.