म. टा. वृत्तसेवा, मनमाड
प्रत्येक शहरात घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत असण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. नागरिकांनी ही थकीत रक्कम भरावी, यासाठी पालिका प्रशासनाला अनेकदा नोटीस बजावावी लागते, कधी थकबाकीदारांच्या दारात ढोल बढवावे लागतात. मात्र मनमाड शहराचा शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा या हेतूने मनमाडमधील वाघ बंधूंनी पुढील १५ वर्षांची घरपट्टी आगाऊ भरली आहे. त्यांच्या या सहभागाची मनमाड शहरात चर्चा होत असून, इतरांनी त्यांचे अनुकरण करावे, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावायासाठी करंजवण योजना तातडीने पूर्णत्वास येणे गरजेचे आहे. या कोट्यवधी रुपयांच्या योजनेची लोकवर्गणी भरण्यासाठी पालिकेला नागरिकांचा आर्थिक हातभार लागत आहे. या योजनेकरिता मनमाडमधील काम मार्गी लागावी याकरिता गणेश व केशव वाघ यांनी पंधरा वर्षाची घरपट्टी आगाऊ भरली आहे. २५ हजार रुपये रोख रक्कम भरून त्यानी या योजनेसाठी हातभार लावला आहे. यावेळी कर अधीक्षक अशोक पाईक, विभाग प्रमुख राजेंद्र भाबड, जितेंद्र केदारे, सुनील दराडे आदी उपस्थित होते. मनमाडचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा यासाठी नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळे भाडे आदी कर लवकरात लवकर भरावे असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान आगाऊ १५ वर्षांची घरपट्टीची रक्कम भरून वाघ कुटुंबीयांनी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मौलिक हातभार लावल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. नागरिकांनी याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.