जिल्ह्यात दिवसभर चिंतेचे ढग; रात्री कोसळले 'निसर्ग'
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
घोंगावणारे चक्रीवादळ बुधवारी सायंकाळी नाशिक, सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यांतील काही गावांमध्ये धडकले. सायंकाळी सातनंतर या परिसरासह शहरातही पावसाचा जोर वाढला. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागाला या वादळाच्या तडाख्याचा सामना करावा न लागल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान दिवसभर सुरू असलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, सप्तश्रृंग गड येथे दरड कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. या वादळाने नाशिकला काहीअंशी प्रभावित केल्याची माहिती हवामान विभागातील सूत्रांनी दिली आहे.
मंगळवारपासून कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्गा हे चक्री वादळ नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून घोंगावत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. हे चक्री वादळ अलिबाग मार्गे, मुंबईत दाखल होणार होते. देवळाली, शिंगवे बहुलासह आसपासच्या गावांना स्पर्शणारे हे वादळ सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यातील काही गावांमध्ये या वादळाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वीज पुरवठा खंडीत होणे, पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडणे यासारखे प्रकार घडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली.
-
कोट
-
मुख्यालय सोडू नका
चक्री वादळाच्या प्रभावामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा सुरळीत असावी आणि सर्वानी सेवेकरिता तत्पर असावे. कोणीही आपले मोबाईल बंद करू नयेत आणि मुख्यालय सोडू नये.
-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक