म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आदिवासी बांधवांसाठी लढलेल्या क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे असून, हा समाज प्रचंड सहनशील, प्रामाणिक, सोशीक आणि कष्टाळू आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत हा समाज विकासाच्या पायरीवर उभा आहे. समाजाला गौरवशाली इतिहास असला, तरी आरोग्य, शिक्षण आणि इतर समस्यांच्या निवारणापासून तो उपेक्षित असल्याचे वारंवार जाणवत असल्याची खंत खासदार डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. आदिवासी सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे शुक्रवारी दुपारी एक वाजता परशुराम साईखेडकर सभागृहात आदिवासी सन्मान सोहळा झाला. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांना सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. खासदार डॉ. पवार अध्यक्षस्थानी होत्या. त्या म्हणाल्या, की आदिवासी समाजाला विकासाच्या विशेष उंचीवर नेण्यासाठी समाजातील युवकांनी उच्च शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर बांधवांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींपर्यंत समाजाचे प्रश्न पोहोचवून त्याला न्याय देण्यासाठी समाजबांधवांनी पुढाकार घ्यायला हवा. संस्कृती आणि मानवी मूल्यांची जोपासना करणाऱ्या समाजासमोरील अडचणींचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही कायम तत्पर असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. सोहळ्यात संस्थापक कैलास शार्दूल, साहित्यिक डॉ. गोपाळ गवारी, प्रवीण कडाळे, शशिकांत मोरे, डॉ. संगीता गवारी, पुंडलीक पिंपळके, अनिता घारे, सुरेश खेताडे, योगेश शेवरे, चित्र तांदळे, सुनील कोकणे, दिनकर पांडे, सुरेश तांदळे, चंद्रकांत चिंचोले, नितीन तांदळे, नितीन राहेरे, रवींद्र करवंदे, शांताराम चारोस्कर, पंडित, खेताडे, अशोक दोबाडे उपस्थित होते. प्रवीण कडाळे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत मोरे यांनी आभार मानले.