चांदवड येथील बैठकीत व्यापाऱ्यांना पडला प्रश्न
म. टा. वृत्तसेवा, चांदवड
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी तसेच व्यापाऱ्यांना साठवणुकीवर अटी लादल्याने संतप्त झालेल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी चांदवडला बैठक घेतली. जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली 'कांद्याचा व्यापार करायची तरी कसा' असा प्रश्न उपस्थित केला. सायंकाळी हे व्यापारी नाशिक येथे जिल्हाधिकाऱ्यांकेड गेले.
केंद्र सरकारने व्यापाऱ्यांच्या खळ्यात कांदा साठविण्यासाठी मोठ्या व्यापाऱ्यांना ५०० क्विंटल तर छोट्या व्यापाऱ्यांना १०० क्विंटलपर्यत मर्यादा केली आहे. याउलट व्यापाऱ्यांची कांदा खरेदी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोजच खळ्यात हजारो क्विंटल कांदे असतात. अशा परिस्थितीत व्यापारी अडचणीत सापडले असून, आत्ता व्यापार करायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी जिल्हाअध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली. या बैठकीला उमराण्याचे खंडूशेठ देवरे, नामपूरचे सचिन मुथा, मुंगसेचे जितेंद्र कापडणीकर, येवल्याचे नंदूशेठ अट्टल, सायखेड्याचे सुरेश कामणकर, देवळ्याचे रमेश मेतकर, सटाण्याचे वर्धमान लुंकड, प्रवीण कदम, चांदवडचे विजय हेडा, प्रवीण हेडा, पारस डुंगरवाल, सचिन अग्रवाल, मोहन अग्रवाल, सुशील पलोड, अनिल हेडा, राजेंद्र व्यवहारे, सचिन कोतवाल, पप्पू हेडा, आदित्य फलके, शरद कोतवाल, वसीम शेख, कैलास कोतवाल आदीसह पिंपळगाव बसवंत, लासलगाव, नाशिक, अंदरसूल, सटाणा, देवळा, मुंगसे, चांदवड, उमराणा, येवला, नांदगाव, मनमाड येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.