प्रा. सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
समाजातील लाखो तरुण आज व्यसनाधीन झाले असून शिवछत्रपतींना हे अपेक्षित नव्हते. त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापूर्वी त्यांचे विचार घेतले पाहिजे. जीवनात खऱ्या अर्थाने कुशल व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, समता, न्यायप्रविष्ठ, कृषी धोरण, बालकांचे व विधवांचे संगोपन व न्याय याचे खरे उदाहरण म्हणजेच शिवचरित्र आहे. आदर राखत त्यांच्या विचारांची जीवनात अंमलबजावणी केली पाहिजे, असे मत प्रा. सोपान वाटपाडे यांनी व्यक्त केले.
इंदिरानगर येथील क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना सन्मान व आदर होता. आता आपण त्यांच्याच स्वराज्यात गर्भलिंग चाचणी करून मुलींची हत्या करीत आहोत. माता-पित्यांचा सांभाळ करण्याऐवजी आपण वृद्धाश्रमांची संख्या वाढवित आहोत. शिवधर्म व शिवतंत्र पाळले पाहिजे. जाती-धर्माच्या नावाखाली दहशतवाद व दंगली घडवून आणल्या जातात. शिवरायांनी अठरा पगड जाती व बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज उभारले, अशी माहिती प्रा. वाटपाडे यांनी दिली.
संस्काराची जपवणूक केली पाहिजे. महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्याची गरज निर्माण झाली आहे. थोड्याशा फायद्यासाठी लोक बेईमानी करतात. परंतु, स्वराज्यात माणसांची मरायची शर्यत लागली होती. शिवरायांनी येथे माणसे पैशावर नाही तर निष्ठेवर तयार केली होती. हुंडा दिला वा घेतला नाही तर हुंडा बळी व प्रथा थांबवा असे फर्मानच महाराजांनी काढले होते. शिवरायांनी ५० किल्ले बांधले, १११ किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. ३६० किल्ले सांभाळले, त्यांची डागडुजी केली. परंतु, कोठेही स्वत:चे नाव दिले नाही. शिवचरित्राचा अभ्यास केला तर समाजात कोणतीही समस्याच राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राजश्री शौचे यांनी प्रा. वाटपाडे यांचा सत्कार केला. रमेश नागरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भालचंद्र जगताप यांनी आभार मानले.