कमांडर विनायक आगाशे यांचे प्रतिपादन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारताचे सैनिक प्राणपणाने लढतात, शहीद होतात, वीरमरण पत्करतात. त्यांना पाकिस्तानसारखा कोणताही देश थांबवू शकत नाही. पाकशी लढताना आपली सर्व ताकद एकवटून त्यांना कसे उत्तर द्यायचे हा एकमेव उद्देश सैनिकासमोर असतो. सैनिकाच्या शौर्यगाथेवर भारताला अजूनही गर्व आहे, असे प्रतिपादन कमांडर विनायक आगाशे यांनी केले.
यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट येथे वसंत व्याख्यानमाला नाशिक संस्थेच्यावतीने 'सैनिकाच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग' या विषयावरील मंगळवारी त्यांनी एकविसावे पुष्प त्यांनी गुंफले. हे पुष्प अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. आगाशे म्हणाले, की काश्मिरचा आज जो भाग आपण नकाशावर पहात आहोत तो केवळ एका माणसामुळे, त्याचे नाव मेजर सोमनाथ शर्मा. मेजर शर्मा नसते तर आज काश्मिरचा आपण पहात आहोत ते भागही आपल्या ताब्यात नसता. १९४७-४८ मधील काश्मिर युद्धाची ही कहाणी. केवळ ७० जवानांना घेऊन पाकच्या भव्य सैनिक संख्येसमोर ते उभे ठाकले. आणि प्राणपणाने लढून त्यांनी पाकचे वाईट मनसुबे उधळून लावले. यात सर्व सैनिकांना व मेजर शर्मा यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्राप्त झाले. हीच कहाणी लेप्टनंट कर्नल बी. टी. चाँद आणि व्ही. सीयाराम यांचीही आहे.
यावेळी मंचावर पुष्कर वैशंपायन यांची उपस्थिती होती. अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतींना अविनाश वाळुंजे यांनी उजाळा दिला. प्रमुख वक्त्यांचा परिचय ओमप्रकाश कुलकर्णी यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले.
आजचे व्याख्यान
वक्ता : संदीप जगताप
विषय : शिवशाही ते लोकशाही
स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट