म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता इंटर्नशिप अनिवार्य करण्यात येणार आहे. इंटर्नशिप केली तरच डिग्री दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जॉब मार्केटच्या पात्रतेचे बनविण्यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहेत. केवळ नावाला डिग्री न देता त्यासोबत क्वॉलिटी एज्युकेशन आणि मुख्यत: वर्क नॉलेज देण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंजिनीअरिंग कॉलेजमधून पासआऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणाऱ्या या निर्णयासंदर्भात राज्यसभेत माहिती दिली. इंटर्नशिपच्या धर्तीवर इंजिनीअरिंग कॉलेजेसच्या अभ्यासक्रमात त्यानुसार बदल केली जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव ‘एआयसीटीई’ने पास केला आहे. याबाबत जावडेकर यांनी राज्यसभेत माहिती सादर केली आहे.
गेल्या काही वर्षात इंजिनीअरिंगचे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात काम करताना पुरेसे प्रशिक्षित नसल्याची टीका वारंवार होताना दिसते. त्यामुळे या पदवीधारकांपैकी केवळ ३५ ते ४० टक्के विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकरी मिळते. विद्यार्थ्यांमधील प्रॅक्टिकल नॉलेज कमकुवत असल्याने इंजिनीअरिंगची डिग्री घेऊनही ते कंपन्यांना पुरेसा न्याय देत नसल्याचे उद्योग समूहांकडून मत व्यक्त केले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमातही बदल केला जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारची इंटर्नशिप अनिवार्य नव्हती. त्यामुळे कंपन्यांना नेमके काय हवे असते, तेथील कामाचे स्वरुप कसे असते, याचा कोणताही अंदाज विद्यार्थ्यांना येत नव्हता. केवळ अभ्यासक्रमांमधून येणे शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. दरम्यान, अजूनपर्यंत या निर्णयाची माहिती कॉलेजांपर्यंत पोहोचली नसून त्याची प्रतीक्षा असल्याच्या प्रतिक्रिया राजेंद्र नाठे व मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य गजानन खराटे यांनी दिली आहे.
इंटर्नशिपचे वेगळे गुण
इंजिनीअरिंगच्या पाचव्या, सहाव्या व सातव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना ही तीन ते २४ महिन्यांची इंटर्नशिप करायची आहे. जेणे करून डिग्री मिळेपर्यंत विद्यार्थी औद्योगिक कंपन्यांसाठी तयार होतील. विशेष म्हणजे इंटर्नशिपचे वेगळे गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.
कॉलेजस्तरावरही उपक्रम
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या पुरेशा संधी मिळाव्यात, यासाठी कॉलेज स्तरांवरही विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, त्यातून ठराविक विद्यार्थीच पुढे येत असल्याने उर्वरित विद्यार्थी मागे राहत आहे. हे चित्र बदलण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
एक्सटर्नल एजन्सीज ठरणार दुवा
कंपन्यांची संख्या व विद्यार्थी संख्या यांचे गुणोत्तर जुळणारे नसल्यामुळे एआयसीटीई काही एक्सटर्नल एजन्सीज दुवा बनविणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळावी, हा त्यामागील उद्देश आहे.