म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बदलत्या काळानुसार शैक्षणिक क्षेत्रातील माहिती, तंत्रज्ञानाची माहिती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या बदलांची जाणीव त्यांच्यात रुजल्यास तो स्वीकारण्यास अधिक सहजता त्यांना प्राप्त होईल, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी केले.
डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्र मंडळातर्फे कै. ताराबाई साळी स्मृतिप्रित्यर्थ आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत साळी होते. देशासाठी विधायक कार्य करण्याची भावना शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे, असेही सभापती म्हणाल्या. चारुदत्त दीक्षित व गायिका मृदुला पिंगळे यांनी 'ज्ञानदिव्याने ज्ञान वाढते' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. सावनी कुलकर्णी, मनीषा इनामदार, वंदना पवार, सुवर्णा पाटील, शोभा कोठावदे, वैशाली चौधरी आदी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका नीता पाटील, सोमनाथ पाटील, स्वाती काळे, मार्तंडराव पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.