जिल्ह्यातील १० तालुक्यात अतिवृष्टी
हतनूरचे ३६ दरवाजे उघडले; पिकांना जीवदान मिळणार
म. टा. प्रतिनिधी, जळगाव
जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनातर्फे करण्यात आली. पावासामुळे हतनुर धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक ९८.४ मिमी, रावेर ९४.१ मिमी, जामनेर ९३.४ मिमी, चाळीसगाव ९० मिमी, जळगाव ८६.७ मिमी, बोदवड ८६.३ मिमी, एरंडोल ८१ मिमी, भुसावळ ७६.८ मिमी, पारोळा ७३.६ मिमी, यावल ६६.४ मिमी अशा १० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. ज्याठिकाणी ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद केली जाते.
जिल्ह्यात ५१.२ टक्के पाऊस
जिल्ह्यात दि.१ जून ते १७ ऑगस्ट कालावधीत ५१.२ टक्के पर्जन्यमान झाले. त्यात जळगाव ५०.६, जामनेर ४४.१, एरंडोल ६७.३, धरणगाव ६६.१, भुसावळ ४१.३, यावल ४१.९, रावेर ४९.७, मुक्ताईनगर ४३.७, बोदवड ५७.०, पाचोरा ४८.८, चाळीसगाव ५१.४, भडगाव ४६.९, अमळनेर ४६.९, पारोळा ६६.५, चोपडा ४९.४ असा एकुण ५१.२ टक्के पाऊस झाला आहे.
धानवड, उमाळा, दापोर्यात घरांची अंशत: पडझड
जळगाव तालुक्यातील धानवड आणि उमाळा येथे प्रत्येकी ३ कच्चा घरांची अंशत: पडझड झाली आहे. तर दापोरा येथील दोन घरांची पडझड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. गुरूवारी झालेल्या दमदार पावसाने वाघूर व हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हतनूर धरणात पाणी येणे सुरू झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. शुक्रवारी धरणाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले.जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे.