म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर मतदारांचे आभार मानण्यासह विधानसभेची मतपेरणी करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली १८ जुलैपासून उत्तर महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंची ही जनआशीर्वाद यात्रा नाशिक जिल्ह्यात तीन दिवस असणार असून, त्याची तयारी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी या तयारीसाठी नाशिकमध्ये तळ ठोकून असून, यात्रा यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मालेगाव, नाशिक आणि नाशिक ग्रामीण असे तीन टप्पे करण्यात आले आहेत.
लोसभा निवडणुकीत भरभरून मते देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी तर मते न देणाऱ्यांची मने जिंकण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रा काढणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेला १८ जुलै रोजी जळगावमधून सुरुवात होणार आहे. राज्यात ही जनआशीर्वाद यात्रा काढली जाणार असून, पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा मानस या निमित्ताने केला जाणार आहे. यात्रा जिथे-जिथे पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी यात्रेमध्ये सहभागी होतील.
यादरम्यान 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.नाशिकमध्ये १९ जुलै ते २१ जुलै असा तीन दिवसांची यात्रा असणार आहे. मालेगावमधून या यात्रेला जिल्ह्यात प्रारंभ होणार असून, २२ तारखेला सदरची यात्रा नगरकडे प्रयाण करणार आहे. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे तयारी करत आहेत. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी शक्दीप्रदर्शनाची तयारी शिवसेनेकडून केली जात आहे.
असा आहे दौरा...
१८ जुलैला जळगाव येथून ही यात्रा सुरू होईल. त्यानंतर १९ जुलै रोजी धुळे-मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात यात्रा पोहचेल. २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल. यात्रेच्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, युवासेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.