म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व मराठी दिनानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने वर्षाआड दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराचा वितरण सोहळा सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. यंदा ख्यातनाम साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सन १९९१ पासून एक वर्षाआड गौरवास्पद लेखन करणाऱ्या मराठी साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३) अरूण साधू (२०१५) या साहित्यिकांना ‘जनस्थान’ने सन्मानित करण्यात आले आहे.
ख्यातनाम लेखक सतीश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत डॉ. विजया राजाध्यक्ष यांची एकमताने निवड करण्यात आली. या समितीत दासू वैद्य, रेखा इनामदार-साने, मोनिका गजेंद्रगडकर, अनुपमा उजगरे यांचा समावेश होता. या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
स्त्रीवादी लेखिका व समीक्षक
दि. ५ ऑगस्ट १९३३ रोजी जन्मलेल्या डॉ. विजया राजाध्यक्ष या मराठी भाषेतील स्त्रीवादी लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात व एसएनडीटी विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होत. कथाकार म्हणूनही त्या परिचित आहेत. कॉलेजात असताना लेखनाला सुरुवात. पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. अधांतर हा पहिला संग्रह. त्यानंतर विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार, अखेरचे पर्व, उत्तरार्ध, आधी…नंतर, असे एकूण १९ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. विजयाबाईंची कथा प्रामुख्याने मध्यमवर्गीय परिवेशातील स्त्रीजीवन चित्रीत करण्यावर भर देते. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा जन्म व मृत्यू या टोकांतील जीवनाचे प्रयोजन, स्त्री-पुरुषांची आणि आई-मूल, पती-पत्नी अशी कौटुंबिक नाती आणि त्यांनी जीवनाला दिलेला अर्थ, यांचा परोपरीने वेध घेणारी त्यांची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते. त्यांच्या तरल, काव्यात्म शैलीने त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. समीक्षात्मक लेखनात कवितारती, जिव्हार स्वानंदाचे आदिमाया, करंदीकरांचे समग्र लघुनिबंध, संवाद ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ या ग्रंथाला साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविले आहे. २००० साली इंदूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विजया राजाध्यक्षा यांनी भूषविले आहे.