अ‍ॅपशहर

नेपाळचे राजा जंग बहाद्दरांची ऐतिहासिक नाशिक भेट!

नाशिक क्षेत्र अनुभवण्याच्या मोह अनेक महान राजे आणि हस्तींना आवरता आलेल्या नसल्याचे दिसते. असेच एक म्हणजे नेपाळचे राजा जंग बहाद्दर राणा!

Authored byरमेश पडवळ | महाराष्ट्र टाइम्स 14 Jun 2021, 6:36 pm
नाशिक : नाशिक क्षेत्र अनुभवण्याच्या मोह अनेक महान राजे आणि हस्तींना आवरता आलेल्या नसल्याचे दिसते. असेच एक म्हणजे नेपाळचे राजा जंग बहाद्दर राणा! लंडनच्या राणीला भेटण्यासाठी निघालेल्या राणांनी आवर्जून नाशिकला भेट देत येथील धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. विशेष म्हणजे, नाशिकचं वेगळेपण टिकवायचं असेल तर शिक्षणावर अधिक भर द्यायला हवा, असे सांगताना नाशिक हायस्कूलच्या इमारतीसाठी त्यांनी १८७५ मध्ये ३० हजारांची मदतही केली, असा उलगडा होतो टाइम्स अर्काइव्हतून....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम king of nepal had given a historical visit to nashik
नेपाळचे राजा जंग बहाद्दरांची ऐतिहासिक नाशिक भेट!


महाराजा जंगबहादूर कुंवर राणा नेपाळचे पहिले राणा प्रधानमंत्री व राणा राजवंशाचे संस्थापक. त्यांच्या काळात त्यांनी नेपाळचा गमावलेला काही भाग ब्रिटिशांशी लढून मिळविला होता. १८५० मध्ये राणी व्हिक्टोरिया शिकारीच्या निमित्ताने नेपाळच्या भेटीवर गेल्या होत्या. १८५७ चा भारतीय विद्रोह मोडून काढण्यात नेपाळने ब्रिटिशांना राजकीय मदत केली होती. यामुळे राणी व्हिक्टोरियाने त्यांना भेटीसाठी लंडनला आमंत्रित केले होते. राजा जंगबहादूर राणा लंडनला जाण्यासाठी जानेवारी १८७५ मध्ये मुंबईत दाखल झाले. या वेळी लंडनला जाण्यापूर्वी त्यांनी धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या नाशिकला भेट द्यायचं ठरविलं. 'टाइम्स आफ इंडिया'मध्ये २६ जानेवारी १८७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, २२ जानेवारीला ते भायखळ्यातून विशेष रेल्वेने नाशिकला दाखल झाले. या वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी ब्रिटिश सैनिकांचं विशेष पथक आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुलासह इतर कुटुंबीयही होते.

त्यांनी २३ जानेवारीला नाशिकची अनेक स्थळे पाहिली. त्यांच्या स्वागतासाठी आयोजित समारंभात नाशिकचे वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी आणि संस्थानिक उपस्थित होते. या स्वागत सभारंभात राजा जंगबहादूर राणा यांनी केलेल्या भाषणाची बातमी 'टाइम्स आफ इंडिया'मध्ये ३० जानेवारीला प्रसिद्ध झाली. आपल्या भाषणात राजा राणा यांनी नाशिकचे प्राचीन, रामायणकालीन महत्त्व सांगताना ही पुण्यभूमी असल्याचे म्हटले आहे. या भूमीचे धार्मिक महत्त्व जपत विकासाची कास नाशिकनं धरायला हवी, असेही सांगताना त्यांनी विकासाकडे जाताना शिक्षणाला महत्त्व दिले तर हे शहर नक्की प्रगती करेल, असे म्हंटले होते. तर फक्त शैक्षणिक प्रगती करा, असे मी म्हणणार नाही तर या प्रगतीत माझाही वाटा असावा, यासाठी नाशिक हायस्कूलसाठी ३० हजारांची देणगीही त्यांनी दिली. नाशिक हे शहर प्रयोगशील असल्याने या शहराचं भविष्य उज्ज्वल असल्याचेही नेपाळचे राजा जंगबहादूर राणा यांनी म्हटले होते. नाशिकच्या प्रगतीत अनेकांचा हातभार आहे हे या एका उदाहरणावरून सांगता येर्इल.

राणीची भेट अर्धवटच राहिलेली...

राजा जंगबहादूर राणा नाशिक भेटीनंतर पुन्हा विशेष रेल्वेने मुंबईत दाखल झाले. मात्र, लंडनला जाण्याच्या आदल्याच दिवशी ते घोड्यावरून पडले आणि जखमी झाले. या घटनेनंतर त्यांनी राणीच्या भेटीला जाण्याचे रद्द केले आणि ते पुन्हा नेपाळला परतले. २५ फेब्रुवारी १८७७ रोजी राजा जंगबहादूर राणा यांचा वयाच्या ६१ व्या वर्षी मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज