अ‍ॅपशहर

मुंबई विद्यापीठाच्या घोळामुळे रखडले ‘लॉ’चे प्रवेश

मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या पेपर तपासणीसंदर्भातील घोळामुळे राज्यभरातच ‘लॉ’ विद्याशाखेचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल पाच महिने उशिरा हे प्रवेश सुरू होणार आहेत.

Maharashtra Times 27 Sep 2017, 4:00 am
jitendra.tarte@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम law admission pending
मुंबई विद्यापीठाच्या घोळामुळे रखडले ‘लॉ’चे प्रवेश

Twitter : jitendra.tarte@MT

नाशिक ः मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या पेपर तपासणीसंदर्भातील घोळामुळे राज्यभरातच ‘लॉ’ विद्याशाखेचे प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे यंदा तब्बल पाच महिने उशिरा हे प्रवेश सुरू होणार आहेत. परिणामी, या विद्याशाखेचे विद्यार्थी प्रवेश घेतील त्याच दिवशी त्यांचा एका सेमिस्टरचा कालावधी संपलेला असेल.

दरवर्षी प्रवेशाला विलंब होणाऱ्या शाखांमध्ये मेडिकल किंवा इंजिनीअरिंगसारख्या विद्याशाखांचा समावेश असतो. यंदाही २१ जुलै रोजी या विद्याशाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केंद्रीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकालही जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आला. मात्र, मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या घोळामुळे या प्रवेशप्रक्रियेत मोठा अडसर उभा राहिला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पदवीचा निकाल नसल्याने हे विद्यार्थी सीईटीमध्ये उत्तीर्ण असूनसुद्धा त्यांच्या डोक्यावर पदवी निकालातील विलंबामुळे टांगती तलवार होती. मुंबई विभागातील लॉ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता, या गोष्टीचा परिणाम एकूणच लॉ विद्याशाखेच्या प्रवेशप्रक्रियेवर झाला आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया रखडली गेली.

राज्यात १८१ कॉलेज

लॉ विद्याशाखेचे शिक्षण देणारे राज्यभरात एकूण १८१ लॉ कॉलेज आहेत. या कॉलेजांमध्ये सुमारे १५,२२० जागा आहेत. यंदा २१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत २७,३४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या संख्येचे प्रमाण लक्षात घेता, सर्व जागांवर प्रवेश होणे अपेक्षित आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात या विद्याशाखेचे एकूण चार कॉलेज आहेत. यातील अभ्यासक्रमांमध्ये सुमारे ६०० जागा उपलब्ध आहेत. या विलंबामुळे जिल्ह्यातील सुमारे ६०० जागांचेही भवितव्य टांगणीला लागले आहे. यंदा विलंबित प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया ९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. याबाबतची मेरिट लिस्ट ७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

एका सेमिस्टरला बसला फटका

गेल्या शैक्षणिक वर्षात ऑगस्टमध्ये लॉ विद्याशाखेची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली होती. यामुळे या विद्यार्थ्यांची पहिली सेमिस्टर परीक्षा जानेवारीमध्ये पार पडली होती, तर दुसरी सेमिस्टर मेमध्ये होऊन वर्ष विनाअडथळा पूर्ण झाले होते. यंदा ९ ऑक्टोबरला ही प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने पहिली सेमिस्टरची प्रक्रियाही आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. या सर्व बाबींबा परिणाम अभ्यासक्रम पूर्ण होण्यावरही होणार आहे. यातच या विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच परीक्षेची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यंदा लांबलेल्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज