म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यात प्रथमच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १७ पिंजरे, ९ ट्रॅप कॅमेरे आणि वनधिकाऱ्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावात बिबट्याला कैद करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा राबत असल्याने गावातील बिबट्या 'व्हीआयपी' ठरल्याची चर्चा रंगते आहे.
दिंडोरीतील परमोरी गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचे वारंवार हल्ले होत आहेत. त्यामध्ये बालकांनाही जीव गमवावा लागला असल्याने तेथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात यापूर्वी फक्त लखमापूरमध्ये १० ते १२ पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जिल्ह्यात सध्या सर्वत्र बिबट्याचा धुमाकूळ असून, नागरिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. त्यामुळे बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागही कठोर पाऊले उचलत आहेत. परमोरी येथे ग्रामस्थांमध्ये भीती अधिक वाढू लागल्याने १७ पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याच्या हालचालींवर तब्बल ९ ट्रॅप कॅमेरे लक्ष ठेवून असून, बिबट्याचा अचूक माग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासोबतच परमोरीत ७ ते ८ वनरक्षकांचे पथक तैनात केले असून, वनधिकाऱ्यांच्या पथकांचीही गस्त त्या ठिकाणी सुरु आहे.
परमोरी गावात घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी १७ पिंजरे, ट्रॅप कॅमेरे व वन अधिकाऱ्यांचे पथक, अशी यंत्रणा त्या ठिकाणी तैनात केली आहे. अधिकारी देखील त्या ठिकाणी वारंवार गस्त घालत आहेत.
- सुनील वाडकर, उपवनसंरक्षक