फोटो : गिरीश महाजन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शेतकऱ्यांचे कितीही नुकसान झाले तरी अधिकाधिक दोन हेक्टरवरील पीक नुकसानीचीच भरपाई सरकारकडून दिली जाते. हा निकष बदलावा आणि जेवढ्या क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले त्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, ही अट शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी नाशिकमध्ये दिली.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्याबाबतची आढावा बैठक महाजन यांनी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या वेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फंरादे, सीमा हिरे, अॅड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, की उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असे होते आहे. या पावसाने पिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. द्राक्ष, कपाशीबरोबरच मका, सोयाबीनसह अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. बाजरी, कापूस, ज्वारी या पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीची मदत म्हणून पहिल्या टप्प्यात दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. आठ दिवसात पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असून, त्यानंतरच किती नुकसान झाले, याचा नेमका अंदाज येऊ शकेल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक ती सर्व मदत शेतकऱ्यांना केली जाईल. जिल्हा बँकेने सक्तीची वसुली, तसेच वीजबिल आकारणी थांबवावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांचे दावे भरून मंजुरीसाठी विमा कंपनीकडे त्वरित पाठविण्यात यावेत. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदारांनी स्वत: क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करण्याची सूचना महाजन यांनी केली. आगामी काळात अशा प्रकारचा पाऊस झाल्यास त्या पाण्याला वाट करून देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. नाशिक विभागात १६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात १,७६६ गावे अवकाळी पावसामुळे बाधित असून, ४ लाख ६२ हजार ५८६ शेतकऱ्यांना या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ३ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित असून, या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाजन यांनी पिंपळगाव बसवंत, पाचोरे वणी, शिरवाडे वणी, तसेच चांदवड तालुक्यातील सोग्रस, तसेच देवळा तालुक्यातील उमराणे, तीसगाव येथे पालकमंत्री महाजन यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. ओझर येथे द्राक्ष बागायतदार संघाच्या सदस्यांसोबत चर्चा केली.