अ‍ॅपशहर

कर्जमाफी ‘जीआर’ची होळी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झाले होते. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष व नियम लावल्याने आपले कर्ज माफ होते की नाही अशी धास्ती ग्रामीण भागात आता व्यक्त होत आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 4:00 am
कारसूळ गावातील शेतकरी आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lone waiver gr fired by farmer
कर्जमाफी ‘जीआर’ची होळी


म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झाले होते. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष व नियम लावल्याने आपले कर्ज माफ होते की नाही अशी धास्ती ग्रामीण भागात आता व्यक्त होत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत या शासकीय ‘जी आर’ची होळी केली.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अशी घोषणा केल्यानंतर तमाम शेतकरीवर्गाने फटाके फोडीत, पेढे वाटून आंदोलनाला यश मिळाले म्हणून आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र आता शासनाच्या कर्जमाफी घोषणेच्या अनुषंगाने अनेक जी आर बाहेर येत असून, ते सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यात सरसकट, तत्वतः व निकष अशा शब्दांमुळे शेतकऱ्यांना अर्थ उमगत नाही. आता कर्जमाफीसाठी अनेक निकष लावलेले पुढे येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपल्या पदरात काहीच पडणार नाही, अशी शक्यता दिसत असल्याने त्यांचा रोष वाढत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या ‘जी आर’ची होळी करीत संताप व्यक्त केला. शब्दाचे खेळ न करता आणि कोणतेही निकष न लावता कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी माजी सरपंच देवेंद्र काजळे, सीताराम जाधव, श्रीराम शंखपाळ, भास्करराव गाडे, दत्तू काजळे, जयवंत ताकाटे, बाबाजी उगले, बबन उगले, रंगनाथ पगार, हनुमंत शंखपाळ, शिवाजीराव ताकाटे, दिलीप उगले, माधव क्षीरसागर, केशव काजळे, राजेंद्र ताकाटे, आदी उपस्थित होते.

‘संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन’

तत्वतः, सरसकट व निकषांच्या आधीन राहून राज्यातील फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रदर्शन त्यांच्यासमोर नको म्हणून घाईगडबडीत व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ फेकत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर झाले त्यापेक्षा तीव्र आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी, अशा शब्दात आपली उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या तीव्र लढ्याला फसवणुकीच्या नावाने सरकारने कर्जमाफी मान्य केली आहे. मात्र नियम व निकषांत कर्जमाफी कशी शक्य आहे. दहा हजार रुपयांची पीककर्जाची घोषणा फसवी निघाली आहे. संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांना आज वाचवू शकतो. याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. कर्जमाफीचे नियम, निकष हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी बनवले की काय? असा सवालही देवीदास पवार यांनी केला आहे. जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकरीवर्गाला उभे केले जात नाही. दहा हजाराचे पीककर्ज हिवाळ्यात देणार का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज