सहकारी बँकेचे तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांनी खंत
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कोणत्याही अर्थसंकल्पात जावक व आवकचा विचार केला जातो. त्यात समतोल साधण्यासाठी खर्च कमी केला जातो. हा कमी खर्च करण्यासाठी केंद्र सरकारला महाराष्ट्रच सापडला. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखवण्यात आल्याची खंत सहकारी बँकेचे तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी केंद्राला सर्वात जास्त पैसा हा महाराष्ट्रातून मिळत असल्याचेही सांगितले.
गोदावरी सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सव सोहळ्यात ते केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की देशात १२० लाख कोटी रुपये बँकींग क्षेत्रात आहे. त्यात २२.८० टक्के महाराष्ट्राचे आहे. गुजरातचा वाटा फक्त ५.४० टक्के आहे. असे असतांना सुद्धा केंद्र सरकारने आंतराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला दिले. ही शोकांतिका आहे. राष्ट्रीयकृत बँकेला ७० हजार कोटी दिले. याच बँकांचे ७१ हजार ५०० कोटीचे घोटाळे बाहेर आले आहे. हे पैसे आपल्या करातून दिले आहेत. आयकॉन सिटीत राज्यात एकही शहर नाही, असेही त्यांनी सांगितले.
अर्थ विश्लेषक व पत्रकार संजय जोग यांनी सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले, यावर विवेचन केले. रेल्वेचा एक प्रकल्प सोडल्यास महाराष्ट्राला काहीच मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात असलेल्या सकरात्मक व नकारात्कम तरतुदींवरही त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस नीलिमा पवार, श्रीराम शेटे, माणिकराव बोरस्ते यांच्यासह बँकेचे संचालक उपस्थितीत होते. वसंत खैरनार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
विस्तारासाठी प्रतीक्षा परवानगीची
बँकेच्या अध्यक्ष अमृता पवार यांनी बँकेच्या २५ वर्षांचा आलेख मांडला. आज बँकेची स्थिती मजबूत असून २०३ कोटींची उलाढाल आहे. १ कोटी ७५ लाख बँकेला नफा झाला असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या विस्तारासाठी चार शाखा उघडण्याची तयारी आहे. पण, त्याला परवानगी मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महिला सबलीकरणासाठी जॉइंट ग्रुप लोनचीही त्यांनी माहिती दिली.