म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वंचित बहुजन आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेली खासदार प्रकाश आंबेडकर यांची सभा त्यांची तब्येत बिघडल्याने ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे सभेसाठी जमलेल्या समर्थकांचा हिरमोड झाला.
वंचित बहुजन आघाडीची सभा मंगळवारी दुपारी तीन वाजता ठक्कर डोम येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या सभेसाठी जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव, दिंडोरीचे उमेदवार अरुण गायकवाड, सिन्नरचे उमेदवार विक्रम कातकाडे, निफाडचे उमेदवार संतोष आहेरराव, नाशिक पूर्वचे उमेदवार संतोष नाथ, नाशिक मध्यचे उमेदवार संजय साबळे, देवळाली मतदारसंघाचे उमेदवार गौतम वाघ, नाशिक पश्चिमचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड या आठ उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे सातपूर, अंबड, सिन्नर भागातील कारखान्यांच्या कामगार संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाहेरगावांहून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुपारी दीड वाजेपासूनच सभास्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सभास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगची विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यांचे भाषण संपताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी व्यासपीठावर येऊन प्रकाश आंबेडकर यांची तब्येत बिघडल्याने ही सभा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित समर्थकांचा हिरमोड झाला. आंबेडकरांचे विचार ऐकायला न मिळाल्याने निराशेचे भाव अनेकांच्या चेहऱ्यांवर दिसून आले.
--
सरकारला खाली खेचण्याची वेळ
प्रकाश आंबेडकर यांचे सभास्थळी आगमन होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या समर्थकांसमोर नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांनी भाषण केले. ते म्हणाले, की गेल्या ६० वर्षांपासून गोरगरीब जनतेला काँग्रेस सरकारने छळले. नाशिकच्या औद्योगिक वसाहतींतील असंख्य कारखाने बंद पडले आहेत. २० हजारांवर कामगारांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारला खाली खेचण्याची हीच वेळ आहे. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचे सरकार निश्चित सत्ता मिळवेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले.