रेल्वे प्रवासात गाडीत चढताना किंवा उतरताना अथवा प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्यास रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. प्रवाशाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे कारण रेल्वे देऊ शकत नाही, हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. त्यामुळे रेल्वेला आपल्या जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. नैसर्गिक मृत्यू आल्यास मुद्दा वेगळा असला, तरीही रेल्वेच्या माध्यमातून अपघात झाल्यास रेल्वेने आर्थिक मदत करणे हे रेल्वेचे कर्तव्यच आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
प्रशासनाला राहावे लागेल तत्पर
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेतून सुखकारक व आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन पुरेशी काळजी घेण्यास तत्पर राहील. अपघात व अन्य कारणांमुळे प्रवासी जखमी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाला यापुढे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
-बाबुलाल मोरे
रेल्वे प्रशासनाची भूमिकाही योग्य
रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४२ ए नुसार आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:हून केलेली इजा गुन्हेगारी कृत्य, नशा आणि वेडेपणाच्या भरात केलेले कृत्य अशा स्थितीत प्रवाशांचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास रेल्वे प्रशासनाने संबंधिताला भरपाई देणे बंधनकार नाही, हा निर्णय न्यायालयांनी परस्परविरोधी निकाल दिले, तरी अत्यंत योग्य वाटतो.
-प्रवीण बागड
चुकीचा पायंडा पडण्याची भीती
रेल्वे रूळ ओलांडणे हा अपराध असतानादेखील अनेक प्रवासी, महिला दररोज ही चूक जाणते व अजाणतेपणातून करीत असतात. त्यांना कोणतीही इजा, अपघात झाल्यास रेल्वेने नुकसानभरपाई द्यावी हे जरा अतिच झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रकारांमुळे चुकीचा पायंडा पडू शकेल. त्यामुळे कायद्याची पायमल्ली होईल असे वाटते.
-शिवा सोनवणे
'त्यांना' भरपाई देणे चुकीचेच
रेल्वे प्रशासनाची चूक नसली, तरी अपघात किंवा तत्सम दुर्दैवी घटनेते रेल्वेने भरपाई देणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर भाष्य करणे अयोग्य आहे. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाची कोणतीही चूक नसताना अपघातग्रस्त व जखमी झालेल्या संबंधित प्रवासी-व्यक्तीला नुकसानभरपाई देणे चुकीचे वाटते.
-निंबा राणे
जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही
रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना इजा किंवा मृत्यू झाल्यास रेल्वेने भरपाई देणे बंधनकारक असल्याचा न्यायालयाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. रेल्वेने उत्तम दर्जाच्या सुविधा दिल्यास निश्चितपणे प्रवाशांना अपघात, घातपातांपासून दूर राहणे शक्य आहे. रेल्वेच्या चुकीला रेल्वेच जबाबदार असल्याने जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. त्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
-शरद अमृतकर
(आमचा आवाज)