म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मातृभूमीच्या संरक्षणार्थ शत्रूशी लढताना शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंर्तगत या घटकांना एसटी महामंडळात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहीद जवानांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विचाराधीन होते. अशा जवानांप्रतीचा आदर जपतानाच त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतचे आदेश जारी केले असून नाशिक विभागालाही हे आदेश प्राप्त झाले आहेत. देशाच्या सिमांवर मातृभूमीचे रक्षण करताना जवानांना शत्रूशी दोन हात करावे लागतात. यामध्ये जवानांना वीरमरण प्राप्त होते अशा शहीद झालेल्या संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांच्या वारसांना शहीद सन्मान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अशा वारसांना सरकार मान्यतेने वर्ग तीन प्रवर्गात नेमणूक मिळू शकणार आहे. वर्ग तीनची पदे वगळता अन्य पदांसाठी शहिदांच्या वारसांना अर्ज करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.
अर्ज पाठविण्याचे आवाहन
शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना एक वर्षांच्या कालावधीत नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. परंतु, शहिदांचे पाल्य अर्ज करण्यासाठी पात्र नसतील अथवा त्यांच्याकडे आवश्यक ती शैक्षणिक अर्हता नसेल तर अहर्ता प्राप्त केल्यापासून एक वर्षाच्या आत सुयोग्य पदासाठी अर्ज करण्याची मुभा त्यांना असणार आहे. अनुकंपा तत्वावर नोकरी देताना कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी आहे. एन. डी. पटेल रोडवरील नाशिक विभागीय कार्यालयात याबाबतची अर्जप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून कामकाजाच्या वेळेत आस्थापना शाखेतून अर्ज घ्यावेत, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. शहीद जवानांच्या वारसांनी आमच्या कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. शैक्षणिक अहर्तेनुसार पात्र लाभार्थींना वर्ग तीन म्हणून नोकरीची संधी मिळू शकेल.
- नितीन मैंद, विभाग नियंत्रक