अ‍ॅपशहर

आता ओबीसींच्या मोर्चाची तयारी

भुजबळांच्या समर्थनार्थ येत्या ३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Maharashtra Times 26 Sep 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम meeting for obc march
आता ओबीसींच्या मोर्चाची तयारी


राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी गेल्या चार-पाच महिन्यांपासून तुरुंगात आहेत. सध्या त्यांची प्रकृती बिघडल्याने ते जे. जे. रुग्णालयात आहेत. त्यांना जामीन मिळत नसल्याने सरकार त्यांच्यावर सूडबुद्ध‌िने कारवाई करत असल्याचा आरोप करत भुजबळांच्या समर्थनार्थ येत्या ३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा मार्ग तपोवन येथील जनार्दन स्वामी आश्रमापासून औरंगाबाद रोडने नवीन आडगाव नाका, संतोष हॉटेल, काट्या मारुती चौक, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, एम. जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय असा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

या मोर्चाची पूर्वतयारी बैठक रविवारी दुपारी २ वाजता जय शंकर फेस्टिवल लॉन्सवर घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बागलाणचे जिल्हापरिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, आरपीआयचे नेते किशोर घाटे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे हाजी बालम पटेल, बारा बलुतेदार संघटनेचे अरुण नेवासकर, मातंग समाजाचे भरत जाधव, सुतार समाजाचे अरुण गाडेकर आदींनी सूचना मांडल्या.

माजी मंत्री दिघोळे म्हणाले की, ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्‍्येने आहे. यामध्ये विविध प्रकारच्या जाती आहेत. त्यामुळे सर्व घटकांपर्यंत या मोर्चाचा प्रचार करून त्यांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. बाळासाहेब कर्डक म्हणाले की, भुजबळ यांनी ठराविक जातींसाठी काम केले नाही तर त्यांनी सर्व थरांतील लोकांसाठी काम केले आहे. नाशिकच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या बैठकीला मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थक उपस्थित होते. बैठकीत मोर्चाची तयारी व नियोजनासंदर्भात सूचना करण्यात आल्या. शिवाय अनेकांनी विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतल्या. संयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी रोख रकमेची मदत केली. काहींनी स्ट‌िकर, बॅनर, पाण्याचे पाऊच, गाड्यांची व्यवस्था अशा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. आज यासाठी विविध भागात जनजागृतीसाठी बैठका, मोटर सायकल रॅली काढली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी मधुकर जेजुरकर, नगरसेवक समाधान जाधव, विजय राऊत, संतोष कमोद, बाजीराव तिडके, अशोक जाधव, सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज