म. टा. प्रतिनिधी, पंचवटी
आडत खरेदीदारांकडूनच वसूल करण्यात यावी, असा राज्य सरकारचा आदेश असतानाही मागील आठवड्यात पानांच्या खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आडत देण्यास नकार दिला. त्यामुळे लिलाव ठप्प झाले होते. पानमळेवाल्यांकडूनच आडत वसूल केली. मात्र, व्यापाऱ्यांना सरकारचा आदेश पाळावा लागेल, अशी तंबी बाजार समितीने दिल्यानंतर पान खरेदीदार व्यापारी आडत देण्यास राजी झाले आणि बुधवारी पानांचे व्यवहार सुरळीत झाले.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फक्त बुधवारीच पानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. या पानांच्या टोपल्या सातारा, सांगली भागातून येतात. इतर भाजीपाला आणि पानांची खरेदी-विक्री यात फरक आहे. भाजीपाल्याचे नियम पानासाठी लागू करू नये, अशी भूमिका पान खरेदीदार व्यापाऱ्यांनी बाजार समितीसमोर मांडली. मात्र, सरकारचे आदेश पाळावेच लागतील, असे सचिव अरुण काळे यांनी पान व्यापारी आणि अडतदार यांची बैठक घेऊन सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. पानांचे लिलाव सायंकाळी पाचला होतात. ही वेळ अडचणी आहे. त्यासाठी बाजार समितीचा पानांसाठीचा सेल हॉल लवकर खाली करून मिळाला तर दुपारी तीन वाजताच लिलाव व्हावेत, अशी मागणी अडतदारांनी केली. बाजार समितीने हॉल खाली करून देण्याचे आश्वासन दिले.
विनापरवाना व्यापाऱ्यांचा भरणा बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या पानाच्या व्यवहारात २५ ते ३० व्यापारी असून त्यांच्यापैकी अनेकांकडे परवानाच नाही. परवाना नसतांनाही अनेक व्यापारी व्यवहार करतात. त्यात नवरात्र आणि गणेशोत्सव काळात पानांची वाढती मागणी लक्षात घेऊन नियमित व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना खरेदीसाठी पान उपलब्ध होत नाही. त्यामुळे लायसन्स नसलेल्या व्यापाऱ्यांना पानाची खरेदी करता येणार नाही असा अडतदारांनी नियम करावा, असे काळे यांनी बैठकीत सांगितले.