म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शनिवारी (दि. २५) चंद्रदर्शन झाल्यास रमजान पर्वाला प्रारंभ होणार असून, या पवित्र पर्वात 'रोजा' (निर्जळ उपवास) दरवर्षीप्रमाणे करायचे आहेत. लॉकडाऊन असल्याने प्रशासनाच्या सूचनेनुसार या पर्वात 'तरावीह' ही विशेष नमाज सर्वांनी घरातच पठण करावी. मशिदीत कोणीही एकत्रित येऊ नये. यासह 'रोजा' सोडण्याच्या इफ्तार विधीकरिता एकत्रित येऊन गर्दी करणे टाळावे, असे आवाहन राज्याचे प्रमुख ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद मुजीब अशरफ यांच्यासह शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.
भद्रकाली, वडाळागाव, भारतनगर, नागजी परिसर, सिडको व सातपूर भागात सहेरी व इफ्तारसाठी खजूर व फळे वाटपासाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. रमजान काळात लॉकडाऊनमुळे फळे व खजुरासह इतर पदार्थ खरेदी करणे शक्य होणार नाही. या काळात गरजवंताना अन्न उपलब्ध करून देण्यासाठी संस्थांनी तयारी सुरू केली आहे.