अ‍ॅपशहर

पक्षी जैववैविध्याचे आता थेट प्रक्षेपण

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भारतातील पहिला अभिनव प्रयोग साकार झाला आहे. तेथील पाण्यात अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आल्याने पक्षीवैविध्याचे दर्शन थेट होणे शक्य झाले आहे.

फणिंद्र मंडलिक | Maharashtra Times 10 Jan 2018, 4:00 am
नाशिक ः महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात भारतातील पहिला अभिनव प्रयोग साकार झाला आहे. तेथील पाण्यात अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आल्याने पक्षीवैविध्याचे दर्शन थेट होणे शक्य झाले आहे. वन विभाग आणि पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांच्या प्रयत्नातून ही संकल्पना साकारली गेली आहे. त्याचा लाभ पक्षी निरीक्षकांना होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nandurmadhyameshwar bird biodiversity now directly launch
पक्षी जैववैविध्याचे आता थेट प्रक्षेपण


पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे गेल्या दहा वर्षांपासून पक्ष्यांचा अभ्यास करीत असून, नांदूरमध्यमेश्वर भागात त्यांचा कायम वावर आहे. सर्वच व्यक्तींकडे अत्याधुनिक दुर्बिणी नसतात; काही ज्येष्ठ व्यक्तींना निरीक्षण मनोऱ्यावर चढता येत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी काही तरी केले पाहिजे असे त्यांना वाटले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त पक्षी निरीक्षक व अभ्यासकांना पक्ष्यांचे दर्शन घडावे यासाठी त्यांनी संशोधन सुरू केले. महिंद्रा कंपनीत जनरल मॅनेजर असलेले गोगटे यांना कंपनीतल्या कामाचा अनुभव कामी आला. पाण्याच्या आत आणि वर कॅमेरे बसविण्याची संकल्पना त्यांनी वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांना सादर केली. त्यांनीही त्यास मान्यता दिली. वनाधिकारी भगवान ढाकरे व भरत शिंदे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन आणि आमदार अनिल कदम यांनाही या संकल्पनेची माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आमदारांच्या प्रस्तावानुसार वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याद्वारेच आता ही संकल्पना तेथे प्रत्यक्षात अवतरली आहे.

अशी राबविली संकल्पना

अभयारण्यामध्ये काम करीत असताना कोणत्याही प्रकारच्या पक्ष्याला, प्राण्याला या साधनांपासून इजा होता कामा नये ही दक्षता घेणे गरजेचे होते. त्यासाठी कमीत कमी कॅमेरे वापरून ही किमया साधायची होती. त्यासाठी ३६० अंशांत फिरणारे दोन कॅमेरे पाण्याखाली बसवण्याचा निर्णय घेतला. आणि हे काम साध्यही झाले. पक्ष्यांना त्रास होऊ नये, यासाठी वायरलेस कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कंट्रोल रूममध्ये बसून हे कॅमेरे झूमइन व झूम आउट करण्याची सोय आहे, तसेच हे कॅमेरे ३६० अंश कोनात फिरत असल्याने पाण्याखालचा भाग आणि वरचेदेखील बहुतांश क्षेत्र लोकांना पाहता येण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे याद्वारे रेकॉर्डिंग करण्याची सोयदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भागात नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने पक्ष्यांच्या संख्येत घट होणे सुरू होते. आता एकाच ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर जैववैविधता पाहण्याची नागरिकांना संधी उपलब्ध झाली आहे. हा प्रयोग प्रथमच नांदूरमध्यमेश्वरला होत आहे. एकावेळी ५० ते १०० नागरिकांना स्क्रीनद्वारे पक्षी पाहता येणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसराचा अभ्यास करतो आहे. माणसांच्या घोळक्याने पक्षी घाबरतात त्यांच्याशी जास्त संपर्क येऊ नये व ज्या लोकांकडे अत्याधुनिक दुर्बिणी नाहीत त्यांना पक्षी दिसावे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.

- सतीश गोगटे, पक्षी अभ्यासक
लेखकाबद्दल
फणिंद्र मंडलिक
फणिंद्र मंडलिक हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत खास प्रतिनिधी, म्हणून कार्यरत आहेत. दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी पत्रकारितेत व्यतित केला आहे. विविध विषयांवर सातत्याने लिखाण करीत असतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज