अ‍ॅपशहर

पालकमंत्री भुजबळ स्वागताध्यक्ष

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर स्वागताध्यक्ष व निमंत्रक निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Authored byफणिंद्र मंडलिक | महाराष्ट्र टाइम्स 25 Jan 2021, 8:47 am
नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर स्वागताध्यक्ष व निमंत्रक निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबळ, तर निमंत्रक म्हणून हेमंत टकले यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांच्या नावांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पालकमंत्री भुजबळ स्वागताध्यक्ष


साहित्य संमेलन नाशिक शहरात होत असल्याने संमेलनाध्यक्ष कोण होणार याबरोबरच स्वागताध्यक्ष व निमंत्रक कोण होणार याचीदेखील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. साहित्यिक वर्तु‌ळात या दोघांच्या नावांवर चर्चा झडत आहेत. कोणतेही संमेलन यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. हा निधी सामान्य कार्यकर्त्यांना जमा करणे शक्य होत नाही. आजवर झालेल्या संमेलनांचा इतिहास पाहिला, तर ज्या संमेलनाला राजाश्रय लाभला तीच संमेलने साहित्यिकांच्या व रसिकांच्या चर्चेत राहिली. तीच संमेलने यशस्वी झाल्याचा दावादेखील अनेकांकडून केला जातो. नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनावरदेखील राजकीय वरदहस्त असावा म्हणून भुजबळांची स्वागताध्यक्ष म्हणून नेमणूक केली जात आहे. भुजबळांच्या पाठीशी प्रशासकीय यंत्रणा असल्याने कोणतीही कामे चुटकीसरशी होण्यास मदत होणार आहे. भुजबळांनी संमेलनस्थळास भेट दिल्यानंतर ताबडतोब जी सूत्रे हलली ती पाहता भुजबळांच्याच गळ्यात स्वागताध्यक्षांची माळ पडणार हे तेव्हाच निश्चित झाले होते. भुजबळ यांनी याअगोदर नाशिक फेस्टिव्हल यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमासाठी कशाची आवश्यकता आहे यांची त्यांना जाण आहे. कार्यकर्त्यांचे बळही पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची स्वागताध्यक्ष म्हणून नेमणूक जवळपास निश्चित मानली जात आहे.

निमंत्रक म्हणून हेमंत टकले यांचे नावदेखील निश्चित मानले जात आहे. टकले लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त आहेत. त्याचबरोबर त्यांचा लहानथोर साहित्यिकांसोबत उत्तम संपर्क आहे. राजकीय क्षेत्रातदेखील त्यांचे वजन आहे. त्यांनीही याअगोदर राष्ट्रावादी काँग्रेसचे मोठे कार्यक्रम यशस्वी करून दाखविले आहेत. जुन्या तंत्राबरोबर नवीन तंत्राची त्यांना उत्तम जाण असल्याने हे संमेलन जागतिक पातळीवर कसे जाईल यासाठी त्यांची मदत मोलाचीच ठरणार आहे. शिवाय त्यांचा लोकहितवादी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह नाशिकच्या साहित्य व नाट्यक्षेत्राशीही घनिष्ट संबंध आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचा राबता असल्याने संमेलनाचे शिवधनुष्य या दोघांच्या भरवशावर सहज उचलले जाऊ शकते, असा साहित्य महामंडळ व लोकहितवादी मंडळाचा दावा आहे.

३९ समित्याही होणार जाहीर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडीनंतर स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांची नेणूक होणार असून, त्यानंतर स्वागत समिती व इतर अशा ३९ समित्या गठित केल्या जाणार आहेत. इतर समित्यांसाठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी लोकांची नावे मागवली होती त्यालादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून, संमेलनासाठी निर्धारित केल्या जाणाऱ्या ३९ समित्या लवकरच अस्तित्वात येणार आहेत. पालकमंत्री भुजबळ यांची स्वागताध्यक्षपदी, तर हेमंत टकले यांची निमंत्रकपदी निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने संमेलनात रंग भरण्यास सुरुवात होणार आहे.
लेखकाबद्दल
फणिंद्र मंडलिक
फणिंद्र मंडलिक हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत खास प्रतिनिधी, म्हणून कार्यरत आहेत. दोन दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी पत्रकारितेत व्यतित केला आहे. विविध विषयांवर सातत्याने लिखाण करीत असतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज