लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर
पाऊस लांबल्याने नामपूर परिसरात चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील नागरिकांच्या सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या आठ ते दहा दुभत्या गायी रात्री चोरीस गेल्याने नागरिक चिंतेत आहेत. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुभत्या गायी असल्याने तिचे वासरु देखील हंबरडा फोडत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून परिसरातील गायी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या संपूर्ण प्रकारामागे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत असलेले पाण्याचे पंप, केबल, फवारणी पंप याचबरोबर शेतीचे साहित्य चोरीस गेले आहे. चोरटे विहिरीतील केबल कापून त्यातील तांब्याची तार बाजारात विकतात. पेरणीच्या तोंडावर शेतीच्या साहित्याची चोरी झाल्याने आधीच दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर नवीन साहित्य खरेदी करण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यात एकाच रात्री पाच दुकाने फोडण्यात आली होती. यात व्यापाऱ्यांच मोठे नुकसान झाल होते.
पोलिस ठाण्याची गरज जायखेडा पोलिस ठाणे अंतर्गत नामपूर पोलिस चौकी येते. नामपूर पोलिस चौकीवर परिसरातील बत्तीस गावांचा भार आहे व त्यासाठी फक्त सहा ते सात पोलिस कर्मचारी असल्याने चोऱ्या वाढल्या आहेत. एकठ्या नामपूर गावाची लोकसंख्या तीस हजाराच्या जवळपास असल्याने पोलिस बळ कमी पडते. या सर्व परिस्थितीचा विचार करता नामपूर येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी करण्यात येत आहे.