- पुरेशी जनजागृती न झाल्याचा परिणाम
- सोशल नेटवर्किंगवरील संदेशांमुळे गोंधळात भर
- प्लास्टिक संकलन केंद्रांचा शोध सुरूच
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/नाशिक
प्लास्टिकबंदी लागू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे, मात्र नाशिककरांमध्ये याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पुरेशी जनजागृती न झाल्याने कोणत्या पद्धतीचा प्लास्टिकवापर चालेल किंवा कोणते प्लास्टिक बाळगले तर दंडात्मक कारवाई होईल, या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. प्लास्टिकच्या ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरल्या तर चालतीत, मॉलमध्ये मिळणाऱ्या किंवा सामानाच्या मोठ्या पिशव्या वापरल्या तर चालतील, अशा पद्धतीचेही संदेश सोशल नेटवर्किंगवरून फिरत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात यातील कोणत्याच माहितीला अधिकृतरीत्या चुकीचे न ठरवल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
उद्या, शनिवारी २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू होत आहे. घरातील प्लास्टिकच्या पिशव्या संकलन केंद्रांमध्ये जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिलेली असतानाही अनेक नाशिककर शेवटच्या क्षणी जागे झाले आहेत. नाशिकमध्ये प्लास्टिक संकलन केंद्रे कुठे आहेत, याची बहुतांश नागरिकांना माहिती नाही. त्यातही सुरुवातीला जाड्या प्लास्टिकच्या पिशव्या चालतील, अशा चर्चा होत असताना राज्य सरकार किंवा महापालिका कोणाकडूनही याचे खंडन करणारी जनजागृती न झाल्याने पातळ प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यासाठी अनेकांनी वापरल्या आणि जाड पिशव्या कशाला टाकायच्या म्हणून घरातच ठेवून दिल्या, असेही चित्र आहे. त्यातच हे पावसाचे दिवस असल्याने अनेकांनी बॅगा, पर्समधील सामान भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशव्या जवळ बाळगल्याचेही आढळते.
संकलन केंद्रे रिकामीच
केवळ दुकानामध्ये मिळणारे सामान, भाज्या, धान्य यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात असे नाही, तर कानातले, क्लिप्स ते इतर प्लास्टिकचे मग, बादली, कपड्यांचे चाप, डबे यासाठीही प्लास्टिकचेच वेष्टण उपलब्ध असते. या वस्तूही प्लास्टिकच्या आवरणातून बाहेर आलेल्या दिसत नाहीत. हातगाडीवरून हे सामान विकणाऱ्या विक्रेत्यांमध्ये तर या संदर्भात फारशी जाणीव-जागृतीही नाही. प्लास्टिकबंदीसंदर्भात ठिकठिकाणी फलक, विविध माध्यमांतून होणाऱ्या जाहिराती याचा मारा झाला असता तर अधिक लोकांपर्यंत या बंदीची माहिती पोहोचली असती. ही माहिती न पोहोचल्याने प्लास्टिक संकलन केंद्रांमध्येही प्लास्टिक पिशव्या फारशा संकलित झालेल्या नाहीत.
नाशिककरांनाही होणार दंड
नाशिक : राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतर त्याच्या विल्हेवाटीसाठी २३ जूनची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत महापालिका हद्दीत केवळ विक्रेत्यांवरच दंडात्मक कारवाई होत होती. आता मात्र बंदी लागू झाल्याने नाशिककरांवरही दंडात्मक कारवाई होईल. यासाठी ५ हजारांचा दंड केला जाणार असून, महापालिकेच्या वतीने सहा विभागीय कार्यालयांमध्ये या कारवाईसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.