अ‍ॅपशहर

नाशिकच्या महिला चित्रकाराचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

ललितकला अकादमी आणि साउथ झोन कल्चरल सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय महिलादिनी कन्याकुमारी येथे १६ ते २२ मार्चदरम्यान झालेल्या महिला कलाकारांच्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये नाशिकच्या चित्रकार मानसी सागर यांना आपल्या कलाकृती सादर करण्याचा मान मिळाला.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 27 Mar 2021, 4:28 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिकच्या महिला चित्रकाराचा राष्ट्रीय स्तरावर गौरव


ललितकला अकादमी आणि साउथ झोन कल्चरल सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय महिलादिनी कन्याकुमारी येथे १६ ते २२ मार्चदरम्यान झालेल्या महिला कलाकारांच्या राष्ट्रीय कॅम्पमध्ये नाशिकच्या चित्रकार मानसी सागर यांना आपल्या कलाकृती सादर करण्याचा मान मिळाला. त्यांनी साकारलेली चित्रे अंदमानच्या कारागृहात प्रदर्शित केली जाणार आहेत.

या कॅम्पमध्ये भारतातील ३६ महिला कलाकारांची निवड करण्यात आली होती. दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक औरंगाबाद, बेंगलुरू, कोलकाता, उटी, केरळ आदी राज्यांतील महिला कलाकार सहभागी झाल्या होत्या. यात महाराष्ट्रातील सात महिला कलाकारांचा समावेश होता. यात महाराष्ट्रातील नाशिकमधून फक्त मानसी सागर यांची निवड झाली होती. कॅम्पमध्ये प्रत्येकी दोन चित्रे काढायची होती. चित्रांचा विषय वीर सावरकर व स्वामी विवेकानंद असा होता. मानसी यांनी अभ्यास करून सावरकरांची जहालवादी आणि मवाळवादी अशी दोन रूपे दाखविली आहेत. पहिले चित्र 'त्रिमूर्ती रिव्होलुशनरीज' आहे. यात सावरकरांचा चेहरा मध्यभागी दिसतोय आणि त्यांच्या दोन्ही बाजूने जोसेफ मॅझिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या चरित्राचा हिंदीत अनुवाद करून तो भारतीय तरुणांपर्यंत पोहोचवला. ते क्रांतिकारी विचार वाचून तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याविषयी ओढ निर्माण झाली पाहिजे हा त्यांचा मानस होता. स्वराज्यासाठी शर्थीने लढणारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव सावरकरांवर होता. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेत असताना पुस्तकांमध्ये खाचा करून त्यात बंदुकी लपवून भारतात पाठवल्या. तेदेखील या चित्रात दाखवले आहे. या चित्राची पार्श्वभूमी त्यांच्या कार्याविषयीच्या बातम्या असलेल्या वृत्तपत्राने दाखवली आहे. त्यात त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली, अभिनव भारत आंदोलन, हिंदुत्वाच्या कल्पना इत्यादींचा उल्लेख दिसतो.

दुसरे चित्र सावरकरांची मवाळवादी बाजू दाखविणारी आहे. शिक्षा भोगून सुटका झाल्यावर ते रत्नागिरी येथे स्थायिक झाले. त्यांना पोलिसांनी कोणत्याही प्रवासास आणि राजकारणास बंदी घातली होती. सामाजिक एकीकरणाचे कार्य सुरू केले. त्यांनी चार वर्णांच्या सामाजिक व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली आणि आपण सगळे एक आहोत. हिंदू आहोत हे भाव जनतेच्या मनात रुजवून एकीने इंग्रजांना सामोरे जाऊन त्यांचा पराभव करता येईल हे सर्वांना समजावले. आपापसातले जातिभेद विसरून सर्वांना ऐक्याचा संदेश देत सर्वांसाठी विठ्ठल मंदिरात प्रवेश खुला करून दिला. याचे चित्रण 'वीर सावरकर द सोशल रिफॉर्मर' या चित्रातून दिसते.


राष्ट्रीय स्तरावर माझी चित्रे सर्वांपुढे आली. मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचाच हा गौरव आहे. मी काढलेली चित्रे येत्या काही दिवसात अंदमानच्या कारागृहात प्रदर्शित होणार आहे.

- मानसी सागर, चित्रकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज