म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्रपक्षांनी मुंबईत केलेल्या 'आम्ही १६२' या शक्तिप्रदर्शनात नाशिकचे नऊ आमदार उपस्थित होते. याअगोदर चार आमदार अजित पवार यांच्या गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. पण, नंतर चौघांनीही आम्ही शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे सहा, शिवसेनेचे दोन व काँग्रेसचा एक असे नऊ आमदार या शक्तिप्रदर्शनात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, दिलीप बनकर, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, काँग्रेसचे हिरामण खोसकर, शिवसेनेचे दादा भुसे, सुहास कांदे यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १५ आमदार असून त्यात महाराष्ट्र विकास आघाडीतील तीन पक्षांचे नऊ, तर भाजपचे पाच व एमआयएमचा एक आमदार आहे. यातील एमआयएमचा आमदार तटस्थ असून इतर १४ आमदार मात्र दोन आघाड्यांत विभागले गेले आहेत. राज्यातील धक्कादायक घडामोडीमुळे कोणता आमदार कोठे आहे, याबाबत तर्क लढवले जात होते. पण, तूर्त आता हे चित्र स्पष्ट झाल्यामुळे मतदारांनाही हायसे वाटू लागले आहे.