राफेल डिलमुळे नाशिकचे नुकसान
काँग्रेस प्रवक्त्या चतुर्वेदी यांचा आरोप; गडकरी, फडणवीसांचाही घोटाळ्याला हातभार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
'राफेल विमान डीलच्या माध्यमातून पंचेचाळीस हजार कोटींच्या तोट्यात असलेल्या उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ४१ हजार कोटींचा लाभ पोहोचविला असून, हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे.' असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहार गोपनीय आहे, असे सांगत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माहिती दडवत आहेत. तर दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच खरेदीशी संबंधीत रिलायन्स डिफेन्स प्रकल्पाची नागपुरमध्ये जागा देवून राफेल घोटाळ्याला हातभार लावण्याचे काम करत आहेत. या घोटाळ्यामळे नाशिकच्या एचएएलसह महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोपही चतुर्वेदी यांनी केला. पंतप्रधानांनी या घोटाळ्याची चौकशी केली नाही, तर रस्त्यावर उतरण्यासह न्यायालयीन लढाईचा मार्ग स्विकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल विमानातील भ्रष्टाचारासंदर्भात काँग्रेसकडून देशभर जनजागृती मोहीम राबवली जात असून, त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेवून राफेल करारात झालेल्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे सादर केली. यावेळी चतुर्वेदी यांनी मोदी सरकार आणि रिलायन्स डिफेन्स कंपनीमध्ये झालेल्या कराराची कागदोपत्री पुरावे सादर करत, आतापर्यंत संरक्षण क्षेत्रात देशात झालेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. बारा दिवसापूर्वी अस्तित्वात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसोबत केलेली राफेल डील हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून, त्यात केंद्रातील सरकारने ४१ हजार २०५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिलायन्स सोबत केलेले डील हे निव्वळ आपल्या सुटबुटातील मित्रांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केले असून, या डीलमुळे नाशिकसह महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. १२६ फायटर जेटची संख्या ३६ वर आणणे आणि त्याची किमंत तिप्पट पटीने वाढवण्यामध्ये कोणते देशहित आहे, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री नसून, प्रचारमंत्री असल्याचा हल्लाबोल त्यांनी मोदींवर केला आहे. नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून, भागीदार असल्याचा आरोप करत, 'भ्रष्टाचार बढाओ' ही सरकारची एकमेव सफल योजना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोदींनी व्यक्तीगत स्वार्थापुढे राष्ट्रहित पणाला लावले आहे. यूपीए आघाडी एक राफेल विमान ५२६ कोटींना खरेदी केले होते. तर, एकूण १२६ विमान घेणार होते. त्यातील १०८ विमाने ही एचएएलमध्ये तयार होणार होती. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगार मिळणार होता. परंतु कर्ज बाजारी झालेल्या आपल्या सुटाबुटातील मित्राला वाचवण्यासाठी फ्रान्ससोबतचा करार रद्द करून रिलायन्सला करारबद्ध केले. यूपीए सरकारने ५२६ कोटीत करारबद्द केलेले विमान मोदी सरकारने १७६० कोटी रुपयात घेतले. तीनपट जास्त किंमत मोजत या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसणाऱ्या रिलायन्सला एवढे मोठे कॉन्ट्रेक्ट देणे कितपत योग्य होते, असा सवालही त्यांनी केला.
मग माहिती का लपवता
विमानाची खरेदी किंमत गोपनीय नाही. यापूर्वीच्या विविध करारांची किंमत संयुक्त आघाडी सरकारने संसदेत दिली आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही माहिती संसदेत विमानांच्या किमंतीसंदर्भात माहिती दिली आहे. रिलायन्सच्या वार्षिक अहवालात हीच माहिती उघड करण्यात आली आहे. राफेल कंपनीच्या अहवालात या कराराचा तपशील जाहीर केलेला आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन कोणाच्या फायद्यासाठी ही माहिती लपवत आहेत? याचे उत्तर देशाला द्यावे लागेल, असे सांगत चतुर्वेदी यांनी माध्यमे, जनतेत, न्यायालय आणि संसदीय समिती या सर्व स्तरावर काँग्रेस लढा देईल, असा इशारा दिला आहे.