म. टा. वृत्तसेवा, निफाड
तरुण मंडळी नववर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या करतात. या ओल्या-सुक्या पार्ट्यांमुळे अनेकदा नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक गैरप्रकार समोर येतात. मात्र काही ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रबोधनात्मक, धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. अशा एक आदर्श उपक्रम निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात आज घेण्यात आला. यातून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हा उपक्रम राबवित आहे. सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
येथील केंद्रात ३१ डिसेंबरच्या रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारित्रासमृत या ग्रंथाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. आदिशक्तीचा जयजयकार, मंत्र जप, गुरुदेव समाधी स्थानावर चादर चढविणे असे अनेक धार्मिक कार्यक्रम रविवारी रात्री ९ ते १२ या वेळात घेण्यात आले. सर्व सेवेकऱ्यांनी रात्री १२ वाजता देवीचा जयजयकार करीत नवीन वर्षाचे स्वागत केले.
सेवेकऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा
नवीन वर्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त सेवा करतानाच पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला. निफाड सेवा केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांनी सेवेकऱ्यांकडून सेवा संकल्पासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेतली. सुभाष खाटेकर, सुलोचना मेधणे, अॅड. जगदीश बागडे, यशवंत शिंदे, सूर्यभान टर्ले, भूषण सोनवणे, संदीप भुजबळ, मंगेश डरंगे, कडलग बाबा आदींसह १०० सेवेकरी सहभागी झाले होते.
नवीन वर्षाचे स्वागत कोण कसे करतो, यापेक्षा आपण कसे करतो आणि करावे हे महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण जरी झाले, तरी आपल्या परंपरेने अध्यात्मिक सेवा करून नववर्ष साजरे करावे, असा आमचा हेतू होता. तसेच गुढीपाडवाही आम्ही आपल्या परंपरेने साजरा करतो.
- वि. दा. व्यवहारे