निफाडचा पारा पाच अंशांवर
थंडीचा जोर कायम; द्राक्षबागांना धोका
म. टा. वृत्तसेवा, निफाड
गेल्या चार ते पाच दिवसांत निफाड तालुक्यात तापमान घसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या घरसलेल्या तापमानाने शनिवारी (दि. १८) ही हाच कित्ता गिरवत वातावरणातील गारठा कायम ठेवला होता. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात शनिवारी (दि. १८) ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
निफाड तालुक्यात शुक्रवारी (दि. १७) राज्यातील सर्वात कमी तापमान २.४ अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर दिवसभर गारठा होता. रात्रीही थंडीचा जोर कायम राहिला. पण, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी तापमानात थोडी भर पडून पाच अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला होता. शनिवारीही पहाटे व सूर्योदयाच्या वेळी वर्दळ कमी होती. थंडी अचानक वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, काही ठिकाणी पहाटेच बागांना पाणी दिले जात आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवस हेच तापमान कायम राहिले तर द्राक्षमणी तडकतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसेच डावणी, भुरी यांसारखे रोग येण्याची भीतीही द्राक्ष उत्पादकांनी बोलून दाखविली आहे.
शेडनेटने बागांचे संरक्षण
या वाढत जाणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता वाढल्याने द्राक्ष उत्पादक चिंतेत पडले आहेत. अति थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण कमी होणे, द्राक्षाच्या वेलींना अन्नपुरवठा कमी होऊन द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी होणे आदी परिणाम होत असल्याचेही उत्पादकांनी सांगितले. दरम्यान, थंडीपासून द्राक्षबागाईतदारांनी बागांचे संरक्षण करण्यासाठी हिरव्या रंगाचे शेड नेट कापड व साड्या तातडीने लावण्याचे काम हाती घेतले आहे. याचबरोबर या द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या पेटवून ऊब निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे.