जय्यत तयारी; देश-विदेशातून येणार लाखो भाविक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संत निरंकारी मिशनतर्फे नाशिकमध्ये प्रथम महासत्संग होत आहे. शुक्रवारपासून (दि. २४) तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती निरंकारी मंडळाच्या प्रसिद्धी विभागाच्या प्रमुख राज कुमारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निरंकारी मिशनच्या प्रमुख सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महासत्संग होणार आहे. राज्यात दरवर्षी मुंबईमध्ये हा सोहळा होतो. यंदा मात्र तो प्रथमच नाशिकमध्ये होत असून, त्यासाठी पेठ रोडवरील बोरगड परिसरातील सुमारे चारशे एकर जागेवर भव्य मंडप उभारणी करण्यात आली आहे. या सत्संगासाठी देशविदेशातून निरंकारी मंडळाचे भक्तगण येणार आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवर तीन अतिरिक्त तिकीट काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई विमानतळ, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, कसारा रेल्वे स्टेशन, मुंबई नाका बस स्टँड आदी ठिकाणांहून भाविकांना सत्संगस्थळी येण्यासाठी मोफत बससेवा पुरविण्यात येणार आहे. सत्संग समारोपांनतरही या प्रवाशांना पुन्हा अशी बससेवा उपलब्ध असेल, अशी माहिती राज कुमारी यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रिमल पन्नू, विवेक मौजी, शंभूनाथ तिवारी, प्रवीण छाबडा आदी उपस्थित होते.
भाविकांसाठी भोजन व्यवस्था
महासत्संगसाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत भोजनाची (लंगर) व्यवस्था आहे. याशिवाय परिसरात सहा विशेष भोजनालये उभारली असून, तेथे अत्यल्प दरात खाद्यपदार्थ तसेच चहा-कॉफी आदी उपलब्ध आहे. सत्संगाच्या मंडपाव्यतिरिक्त सत्संग कमिटी, पाच प्रकाशन स्टॉल असून, येथे मिशनची प्रकाशने विक्रीसाठी आहेत. यात प्रदर्शनाचाही एक स्टॉल असून, त्यात मिशनचा इतिहास, उपक्रम, ९० वर्षांतील योगदान याविषयी सचित्र माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. बालकांचेही एक विशेष प्रदर्शन असून, त्यात त्यांनी बनविलेले मॉडेल्स, कटआउट्स, चित्रे, रेखाटने, कलाकुसरीच्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत.
अशी आहे रुपरेषा
सत्संगाचा प्रारंभ शुक्रवारी (दि. २४) भव्य शोभायात्रेने होईल. पेठ रोडवरील राऊ हॉटेलपासून महासत्संग स्थळापर्यंत सद्गुरू सुदीक्षाजी माताजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य मंडपात सत्संगाला सुरुवात होईल. रात्री ९ वाजेपर्यंत सत्संग चालणार असून, यात विविध गीते, कविता यांबरोबरच सुदीक्षाजी महाराज यांचे प्रवचन होईल. शनिवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान मिशनच्या सेवादलाची रॅली काढली जाणार असून, हजारो महिला-पुरुष विशिष्ट गणवेशात त्यात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी अडीच ते रात्री ९ दरम्यान सत्संग होईल. रविवारी (दि. २६) दुपारी याच वेळेत सत्संग होईल. यात एक बहुभाषी कविसंमेलन सादर केले जाणार आहे, ज्यात २० कवींचा सहभाग असेल. रात्री ९ वाजता सुदीक्षाजी यांच्या प्रवचनाने सत्संगाचा समारोप होईल. सोमवारी (दि. २७) ६० जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा होणार आहे. यंदाचा संत समागम 'संत निरंकारी मिशनची ९० वर्षे' या विषयाला समर्पित आहे. आध्यात्मिक पुनरुत्थान, धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचे कल्याण या क्षेत्रात मिशनने मागील नऊ दशकांत दिलेल्या योगदानांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
मिशनचे कार्य
मानवतेची सेवा करण्यासाठी मिशनने आजवर रक्तदानासाठी सहा हजार ३८० शिबिरे घेतली आहेत. चार धर्मादाय हॉस्पिटल, १३० दवाखाने, १४ अॅम्ब्युलन्स आणि आठ पॅथॉलॉजिकल लॅबरोटरिज मिशनतर्फे चालविल्या जातात. राज्यात मिशनचे २२ मोफत दवाखाने आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल्स, ऐतिहासिक स्थळे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मिशनतर्फे स्वच्छता करण्यात येते. गेल्या दोन महिन्यांपासून बोरगड परिसर भाविकांनी लख्ख केला आहे. दररोज शेकडो भाविक दिसेल त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी गुंतलेले दिसून येतात.
बोरगड परिसर लखलखले
सुमारे दोनशे एकर परिसरात उभारलेल्या सर्व मंडपांभोवती तसेच आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर प्रथमच विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. यासाठी पाच डीपी नव्याने घेण्यात आलेल्या आहेत. सत्संगस्थळी अत्यल्प दरात खाद्यपदार्थ मिळत असल्याने त्याचा लाभ स्थानिक नागरिकही घेताना दिसत आहेत. स्थानिकांकडूनही तेथे सेवा दिली जात आहे. प्रथमच असा मोठा सोहळा होत असल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.