इंट्रो...
नाशिक शहरात रुग्णांची संख्या वाढत असली तरी येथील आरोग्य यंत्रणा तत्पर आहे. संशयित तसेच करोना रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेचे सध्याचे कामाचे स्वरुप आणि वाढती रुग्णसंख्या याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांच्याशी केलेली बातचीत...
वाढत्या रुग्णसंख्येबाबत काय सांगाल?
शहरात आणि ग्रामीण भागातही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ बाधित रुग्ण राहात असलेल्या परिसरात आरोग्य यंत्रणांकडून योग्य रितीने सर्व्हेक्षण सुरू आहे. जास्तीत जास्त बाधित रुग्णांना लवकरात लवकर उपचाराखाली आणणे त्यामुळे शक्य होत असून, यातूनही करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होत आहे.
-
बाधितांची वाढता आकडा कधी थांबणार?
हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे तो इतक्या लवकर आणि सहजासहजी थांबणार नाही. जास्तीत जास्त संशयित रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांच्या तपासण्या करण्याची पद्धती आपण मालेगावातही अवलंबली होती. त्यामुळे एका कालावधीत मालेगावातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली. आता मात्र तेथे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नाशिक शहरातही आता रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे. पुढील १५ दिवसांत सर्व्हेक्षणाखालील लोक वाढतील तशी ती वाढत जाईल. त्यामुळेच पुढील १५ दिवस जोखमीचे आहेत.
-
बाधितांवर उपचाराची पद्धती काय आहे?
सौम्य लक्षणे, मध्यम तीव्रता व तीव्र संसर्ग असलेले रुग्ण असे बाधित रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटल किंवा सिव्हिल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, आडगाव येथील मेडीकल कॉलेज येथे दाखल केले जाते. आजाराची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार उपचार दिले जात आहेत. आपल्याकडे ८० ते ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत. काही रुग्णांचे मृत्यू झाले हे वास्तव असले तरी उशिराने दाखल झालेले किंवा गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या वृद्ध व्यक्तींच्याच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
-
कोविड-१९ झाला आहे हे कसे समजावे?
सामान्य आजारात दिसणारी ताप, खोकला यांसारखी लक्षणे या आजारातही जाणवतात. दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे जाणवू लागली तर रुग्णाने जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करून घ्यायला हवी. लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित रुग्णावर औषधोपचार सुरू करता येतात.
-
संसर्ग टाळण्यासाठी काय करायला हवे?
करोनाचे विषाणू तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे मास्कचा वापर अनिवार्य आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मास्क तोंडावरून न काढण्याची सवय प्रत्येकाने करून घ्यायला हवी. यातूनच संरक्षण होणार आहे. याशिवाय कोणत्याही व्यक्तीशी बोलताना किमान तीन फुटांचे अंतर ठेवायला हवे. नाक, तोंड, डोळे यांना हातांनी स्पर्श करणे टाळायला हवे. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची याबाबतीत अधिक काळजी घ्यायला हवी.
-
संकलन : प्रवीण बिडवे