पक्षिमित्रांची आंदोलनाद्वारे वन विभागाकडे मागणी
...
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नांदूरमध्यमेश्वर येथे पक्षी संवर्धन समिती नेमण्याची गरज असून, तेथील पक्ष्यांचे संरक्षण व त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी अभयारण्याचे कार्यालय होणे गरजेचे आहे. अवैध मासेमारीलाही लगाम बसावा, यासह इतर मागण्यांसाठी शहरातील पक्षिमित्रांतर्फे मंगळवारी मुख्य संरक्षकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. अभयारण्यात अभय कोणाला, पक्षांना की अवैध मच्छिमारांना' अशा घोषण देण्यात आल्या. यावेळी लहान मुलांनी व काही तरुणांनी पक्ष्यांच्या टोप्या परिधान केल्या होत्या.
नांदूरमध्यमेश्वर येथील समस्यांचा पाढा मुख्य वन संरक्षकांसमोर वाचण्यात आला. वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांची पक्षिमित्रांनी भेट घेतली. त्यावेळी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील मासेमारी थांबवावी, अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतर करावे, जखमी पक्ष्यांना अभयारण्यातच उपचार मिळावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. स्थानिक राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे वन अधिकाऱ्यांवर नांदूरमध्यमेश्वर येथे दबाव येत असून, त्यासाठी ठाम भूमिका घ्यावी, असे पक्षिमित्रांनी मुख्य वनसंरक्षकांना आवाहन केले. तसेच त्या ठिकाणी वन विभागाच्या अंतर्गत पक्षी संरक्षण समिती स्थापन करावी, त्याचप्रमाणे तेथे गाईड काम करणाऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, पर्यटकांनाही योग्य सुविधा नाहीत, त्याकडेही लक्ष द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शहरतील सर्व पक्षिमित्र, प्राणीमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणावर संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थांचे सदस्य एकत्रित आंदोलनात सहभागी झाले होते.
--
\Bकायदेशीर कारवाई व्हावी\B
नांदूरमध्यमेश्वर येथे पक्ष्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पक्षिमित्रांकडून करण्यात आली. त्यानुसार पक्ष्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन वनधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले.
...
सरकारकडून सूचना आल्याशिवाय अभयारण्याच्या मुख्यालयाचे स्थलांतर शक्य नाही. मात्र, नियमांतर्गत पक्षी संवर्धनासाठी योग्य सुविधा पुरवण्यात येतील. पक्ष्यांच्या जीवाला घातक कृत्य करणाऱ्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल.
\B- अनिल अंजनकर, मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग\B