म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीचे प्रवेश जवळपास पूर्ण झाले असले तरीही राज्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा फायदा नाशिकच्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. राज्यात नागपूर आणि मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम अकरावीच्या ऑनलाईन प्रक्रियेवरही होत असल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या अगोदर पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी पुन्हा आजची (११ जुलै) मुदतवाढ दिली आहे.
१२ जुलै : रिक्त जागांचा तपशील वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.
१२ व १३ जुलै : ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरता येईल. विद्यार्थी त्यांचे ऑप्शन फॉर्मचे एडिटींग करू शकतात.
१६ जुलै : दुसरी गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
१९ जुलै : दुसऱ्या गुणवत्ता यादीतील रिक्त जागा आणि कट ऑफचा तपशील जाहीर करण्यात येईल.
१९ व २० जुलै : ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरता येईल. विद्यार्थी त्यांच्या ऑप्शन फॉर्मचे एडिटींग करू शकतात.
२३ जुलै : तिसरी गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
२४ ते २६ जुलै : तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश
२७ जुलै : रिक्त जागांचा तपशील वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात येईल.
२७ व २८ जुलै : ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग १ व २ भरता येईल. ऑप्शन फॉर्म विद्यार्थ्यांना एडिटही करता येईल.
३० जुलै : चौथी गुणवत्ता यादी वेबसाइटवर प्रसिद्ध होईल.
३० जुलै २ ऑगस्ट : चौथ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रिया.
अभ्यासक्रम कॉलेजांनीच पूर्ण करावा
अकरावी प्रवेश प्रक्रियेंतर्गत ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी सुमारे ७० टक्के प्रवेश पूर्ण केले आहेत त्या महाविद्यालयांना नियमित तासिका सुरू करता येणार आहेत. तासिका सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला तर त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून द्यायची जबाबदारीदेखील महाविद्यालयांची असणार आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयांनी ज्यादा तासिकांची व्यवस्था करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
५३८९ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
अकरावी ऑनलाइन प्रक्रियेंतर्गत नाशिक शहरातून ५७ कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये २७ हजार जागा या आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि एमसीव्हीसी या विद्याशाखांसाठी उपलब्ध आहेत. पहिल्या प्रवेश फेरीत ११ हजार ५६२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. पैकी ५३८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. ५७८० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला असला तरीही प्रवेश अंतिम निश्चित केलेला नाही. एकूण ११ हजार १६९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांशी प्रवेशासाठी पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत संपर्क साधला आहे.
चौथ्या यादीतील प्रवेश
१ ते ४ ऑगस्ट - नियमित चार फेऱ्यांमधून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोफोकल विषयांच्या रिक्त जागांसाठी कॉलेजस्तरावर अर्ज करून आरक्षण व गुणवत्तेनुसार प्रवेश देणे व ऑनलाइन अपलोड करणे, ही प्रक्रिया सुरू असेल.