अ‍ॅपशहर

कांदा शंभर रुपये क्विंटल

यंदाच्या हंगामात उन्हाळ कांदा बाजारभावाने ठेंगा दाखवताना उत्पादक शेतकऱ्यांसमोरचे अर्थसंकट गेल्या दोन आठवड्यातील बाजारभावाच्या पडझडीने गहिरे झाले आहे.

Maharashtra Times 22 May 2017, 4:00 am
येवला बाजार समितीतील प्रकार; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम onion 100 ruppes per quintal at yeola bajar samiti
कांदा शंभर रुपये क्विंटल


म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या हंगामात उन्हाळ कांदा बाजारभावाने ठेंगा दाखवताना उत्पादक शेतकऱ्यांसमोरचे अर्थसंकट गेल्या दोन आठवड्यातील बाजारभावाच्या पडझडीने गहिरे झाले आहे. ख्‍ारिपाचा पुढील हंगाम तोंडावर आलेला असताना जिल्हा बँकेच्या तिजोरीतील खडखडाटामुळे खरीप पीक कर्जाची शाश्वती दिसत नाही. दिवसागणिक कोसळणाऱ्या बाजारभावातून हाती उत्पादन खर्चही पडत नसल्याने ‘संकट टळेना, कांदा बाजारभावाचा सूर जुळेना’अशीच गत कष्टकरी शेतकऱ्याची झाली आहे. येवला बाजार समितीत तर चालू आठवड्यात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटलमागे किमान केवळ शंभर रुपयांचा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.

गेल्या आठवड्यातील कांदा बाजारभावातील मोठ्या घसरणीतून हाती पडलेल्या अगदी कवडीमोल दामाने शेतकऱ्यांना घाम फोडला आहे. या मार्च महिन्यात मिळालेला बाजारभाव आज ना उद्या सुधारेल आणि हा उन्हाळ कांदा श्रम व घामाचे दोन पैसे अधिकचे नक्कीच हाती टेकवेल, ही उत्पादक शेतकऱ्यांची आशा चालू मे महिना सरतीकडे असतानाही फलद्रूप होऊ शकली नाही. उन्हाळ कांद्याचा भाव सध्या अवघ्या १०० रुपये क्विंटलवर आल्याने कष्टकरी शेतकऱ्याची व्यथा राज्यकर्ते समजून घेणार की नाही? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

उत्पादन खर्चही निघेना

उन्हाळ कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना आलेला खर्च बघितला तर प्रतिएकर जवळपास ५० ते ६० हजार खर्च ठरलेला. उन्हाळ कांद्याचे एकरी साधारण सव्वाशे ते दीडशे क्विंटल उत्पादन निघते. या कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये भाव मिळाला तर दीडशे क्विंटलचे ४५ हजार रुपये शेतकऱ्याच्या हाती पडतात. हाती पडणारे हे दाम अन् एकरी झालेला एकूण उत्पादन खर्च बघितला तर उत्पादन खर्चही निघेना हे वास्तव नाकारता येत नाही.

२५ रुपये भाव ही तर थट्टाच

दहा दिवसांपूर्वी तर येवला बाजार समितीमधील समोर आलेलं उदाहरण अन् एका शेतकऱ्याच्या उन्हाळ कांद्याला मिळालेला अवघा २५ रुपये क्विंटल हा भाव या शेतकऱ्याचे एकप्रकारे डोळे पांढरे करणारा ठरला. तालुक्यातील मुखेड येथील शेतकरी भास्कर निवृत्ती आहेर यांनी भाडोत्री ट्रक्टर लाऊन आपला उन्हाळ कांदा बाजार समितीत आणला. कांदा गोल्टी असल्याचे कारण देत त्याला लिलावात भाव मिळाला तो अवघे २५ रुपये क्विंटल. १० क्विंटल ६५ किलो क्विंटल उन्हाळ कांद्याचे २६६ रुपये २५ पैसे झाले. त्यातून ५७ रुपये ७२ पैसे हमाली, ४२ रुपये साठ पैसे तोलाई तर ७ रुपये ९८ पैसे वाराई, गेट पासचे ५ रुपये असे एकूण ११३ रुपये ३० पैसे वजा जावून आहेर यांच्या हाती पडले, ते अवघे १५२ रुपये ९५ पैसे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज