माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आपल्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे, कोणत्या क्षेत्रात अधिकारी व्हायचे आहे, मी कशाला जन्माला आलो. मला कोणत्या ध्येयाने वाटचाल करायची आहे. जीवनाच्या रचलेल्या उतरंडीवर चालायचे की वेगळा मार्ग चोखाळायचा. याचा विचार करून ज्याचा अंतरीचा आवाज पेटेल तोच युवक जीवनात यशस्वी होईल, असे उद्गार माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्यख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानमालेचे ३९ वे पुष्प गंगापूर रोडवरच्या शंकराचार्य न्यास संकुल येथील सभागृहात गुंफण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, संस्थेचे विश्वस्त चांगदेवराव होळकर आदी उपस्थित होते. 'यशाची गुरुकिल्ली' या विषयावर धर्माधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी संतांची परंपरा आहे. मात्र, ती आपल्याला शिकवलीच जात नाही. अभ्यासक्रमातही १८५० नंतरचा महाराष्ट्र शिकविला जातो, ही शोकांतिका आहे. आपण गुलाम आहोत, हे पहिले मनावर ठसविले जाते. ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा शिकवला जात नाही. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेईन, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. दुर्दैवाने याच एक्सलन्सकडे आपण कानाडोळा करतो आहे. तू कशाला एकटा मरतो, पगार मिळतोय ना मग कशाला मरायचे, ही वृत्ती जात नाही तोपर्यंत यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले.
सध्या जीवन जगण्याचे निकष बदलले आहे. सायन्सकडे गेलेला विद्यार्थी हुशार आणि आर्टसकडे गेलेला विद्यार्थी कमी हुशार ही प्रवृत्ती बळवत आहे. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. यशस्वी होण्यासाठी कोणतेही क्षेत्र निषिद्ध नाही, ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्रात व्यासंग निर्माण करेन, त्या क्षेत्राचा अधिकाधिक अभ्यास करून माझे व्यक्तिमत्व कसे चांगले होईल याकडे जो विद्यार्थी लक्ष देतो तोच विद्यार्थी यशस्वी होतो, असे ते म्हणाले. आश्विनी पवार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले.