येवल्यातही अवकाळीच्या धारा
तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर संकट गडद
म. टा. वृत्तसेवा, येवला
येवला तालुक्यात गुरुवारी (दि. २६) मध्यरात्रीनंतर अधूनमधून विश्रांती घेत शुक्रवारी (दि. २७) सकाळपर्यंत तुरळक तर कधी मध्यम स्वरूपाच्या अवकाळीच्या धारा बरसल्या. विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह काहीशा वादळवाऱ्यासंगे हा अवकाळी पाऊस होताना येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले.
येवला शहर परिसर व तालुक्यात गुरुवारी (दि. २६) मध्यरात्री एक वाजेनंतर सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. कुठे वीस ते कुठे अर्धा तास हा पाऊस झाल्यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि. २७) पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाने विश्रांती घेत पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास सरी बरसल्या. शुक्रवारी सकाळी सव्वा आठ वाजेच्यासुमारास पुन्हा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर क्षेत्रातील काढणीला आलेला तसेच शेतशिवारात उभा असलेला रब्बी उन्हाळ कांदा व गहू या पिकांची गुणवत्ता ढासळून उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. पुढील हंगामाकरिता कांदा बियाणेसाठी तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेले डोंगळेदेखील या पावसामुळे बाधित होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या तालुक्यात शेतकरी उन्हाळ कांदा जमिनीतून बाहेर काढत असून, काढलेल्या कांद्याच्या शेतात पोळी घातल्या आहेत. यामध्ये अवकाळी पावसाचे पाणी घुसून अनेकांचा कांदा भिजला. गेल्या चार-पाच दिवसांतील वातावरण अचानक बदलल्याने तालुक्यातील उन्हाळ कांद्यावरदेखील करपाची लागण झाली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे.
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. पुढील वर्षीच्या हंगामासाठी घेतलेल्या डोंगळ्यांतून उन्हाळ व लाल कांद्याचे बियाणे सध्या तयार होण्याच्या स्थितीत आहे. आधीच मधुमक्षिका नसल्याने परागीकरण झालेले नाही. त्यातून ५० ते ६० टक्के बियाणेवर फुली पडली आहे.
- विजय भोरकडे, शेतकरी