सराफ बाजारात घेतली विश्रांती
..
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संत निवृत्तिनाथांची भेट घेतल्यानंतर पुन्हा पैठणच्या दिशेने निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आणि दिंडीतील थकलेली पावले नाशिकनगरीत विसावली. शेकडो किलोमीटर चालून विसावा घेतल्यानंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह दिसत होता. श्री निवृत्तिनाथांच्या भेटीमुळे ऊर्जा अधिक वाढल्याचे यावेळी वारकऱ्यांनी सांगितले. सराफ बाजारात विश्रांतीसाठी आलेल्या या पालखीमुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले.
पैठणच्या एकनाथ महाराजांची पालखी गेल्या तीन पिढ्यांपासून सराफ बाजारातील सुंदर रसवंतीगृह येथे जगताप कुटुंबाकडे येते. पालखीची सेवा करण्याची संधी आम्हाला शेकडो वर्षांपासून मिळत असून, या मार्गातून संत परंपरेचा प्रचार प्रसार होत असल्याचे मत हेमंत जगताप यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. २२) सायंकाळी सात वाजता रसवंतीगृह येथे भोजन केल्यानंतर काळामंदिर येथे दिंडीने मुक्काम केला. दरवर्षी पैठणहून एकनाथ महाराजांची दिंडी त्र्यंबकेश्वरला येत असते. शेवगाव, रांगणी, मुक्तापूर, भानटाकळी, डिघी, साकोरी, दुसंगवाडी, गुळवंच, जाखोरी, नाशिक, महिरावणी असा मुक्काम करीत दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहोचते. या दिंडीला विशेष मान असून, पौष त्रयोदशीला काल्याचे कीर्तन झाल्यानंतर या दिंडीचा सन्मान केला जातो. दत्तोबा साबळे नवगावकर यांच्या कुटुंबाकडे या दिंडीचे प्रमुखपद आहे. गुरुवारी (दि. २३) पहाटे रामकुंडात स्नान केल्यानंतर नाशिकरोडमार्गे दिंडी पैठणला रवाना झाली. यावेळी महिलांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळीने दिंडीचे स्वागत केले. सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या दिंडीत पुंडलिक गोरडे, रमेश जरांगे, सदाशिव जाधव, लक्ष्मण तांबे, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह वारकरी सहभागी झाले आहेत.