अ‍ॅपशहर

समांतर रस्ते ठरताहेत अपघातांचे केंद्र

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर उड्डाणपूल उभारल्यानंतर शहरातील सर्वच वाहनांना लगतच्या समांतर रस्त्याचा वापर करावा लागत आहे. हे सर्व समांतर रस्ते हे दुतर्फा करण्यात आले असले तरी हे रस्ते अपघाताला निमंत्रकच ठरत आहेत. या रस्त्यांवर कोठेही दुतर्फा असल्याचे फलक नसून, या रस्त्यांलगत वाढलेले अतिक्रमण याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Times 25 Mar 2018, 4:00 am
अवजड वाहनांच्या वाहतुकीचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parallel roads are known as an accident center at nashik city flyover
समांतर रस्ते ठरताहेत अपघातांचे केंद्र


म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर उड्डाणपूल उभारल्यानंतर शहरातील सर्वच वाहनांना लगतच्या समांतर रस्त्याचा वापर करावा लागत आहे. हे सर्व समांतर रस्ते हे दुतर्फा करण्यात आले असले तरी हे रस्ते अपघाताला निमंत्रकच ठरत आहेत. या रस्त्यांवर कोठेही दुतर्फा असल्याचे फलक नसून, या रस्त्यांलगत वाढलेले अतिक्रमण याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला. हा पूल उभारल्यामुळे लहान वाहनांबरोबरच अनेक मोठे व अवजड वाहनेसुद्धा सध्या समांतर रस्त्यावरून जात असतात. समांतर रस्ते दुतर्फा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. शहरातील वाहनचालकांना हे समांतर रस्ते दुतर्फा असल्याचे माहित असले तरी बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना याची कल्पना नसते. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. तसेच समांतर रस्ता आणि उड्डाणपूल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खुली जागा सोडण्यात आल्याने हे समांतर रस्ते अरुंद झाले आहेत.

अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त

मुख्यतः गोविंदनगर, भुजबळ फार्म चौफुली, कमोदनगर, लेखानगर याठिकाणी तर वारंवार अपघात होत असतात. समांतर रस्त्यांची रुंदी कमी असल्यानेच बऱ्याच ठिकाणी एकावेळी दोन गाड्या ये-जा करूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरेाबर समांतर रस्त्यालगत असलेल्या विविध व्यावसायिक व हॉटेल्सचे पार्किंगसुद्धा रस्त्यालगत असल्याने आधीच अरूंद रस्ते वाहतुकीस अजून छोटे होतात. त्यामुळे या समांतर रस्त्यालगत असलेले अतिक्रमणही हटविणे क्रमप्राप्त आहे. आजपर्यंत अनेक लहान मोठे अपघात या समांतर रस्त्यांवर झाले असून अनेकांनी यात आपले प्राणसुद्धा गमविले असल्याचे समोर आले आहे.

रस्त्यांबाबत फलक लावावेत

उड्डाणपूल आणि समांतर रस्ता यांच्या मधोमध खुली जागा सोडून त्यावर झाडे लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी ही जागा सुशोभित केलेली दिसते तर काही ठिकाणी येथे कचरा व गवतच दिसून येते. त्यामुळे ही जागा कमी केल्यास समांतर रस्ते रुंद करण्यास मदत होऊ शकते. समांतर रस्ते हे दुतर्फा असल्याचे कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी किंवा महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी हे रस्ते दुतर्फा असल्याचे फलक लावणेही अपेक्षित आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज