मंत्र्याच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
...
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधन व विविध प्रश्नांसंबधी मनेरगा कर्मचारी संघटनेने रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांना पत्र पाठवले आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यात दिला आहे. या पत्रात कंत्राटी कर्मचारी यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित मानधन, दोन वर्षातील आठ टक्के वाढीव फरकाची प्रलंबित रक्कम अदा करणे, तसेच कंत्राटी कर्मचारी यांच्यासोबत सातत्याने होत असलेल्या अन्यायाबाबत व हुकूमशाही पद्धतीने कामावरून काढण्याची सातत्याने होत असलेल्या दमबाजीचे प्रश्न मांडले आहेत.
सन २०११ पासून ते आतापर्यंत रोजगार हमी योजनेत विविध पदावरील कंत्राटी कर्मचारी हे कार्यरत असून, अत्यंत अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत. पण, आता काम करूनही चार महिने मानधन दिले जात नाही, घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कर्मचारी यांच्याकडे पैसे नाही, मानधन कधी होणार विचारायचे नाही, विचारले तर काम सोडण्याची भाषा अधिकारी करतात, वरिष्ठांकडे तक्रार केलेल्या कर्मचारी यांना कामावरून कमी करण्याची धमकी अधिकारी व इतर संबंधित देत असून, अशा कर्मचारी यांना लगेच गैरसोयीच्या ठिकाणी बदली करणे, अशा पद्धतीने कंत्राटी कर्मचारी यांच्यावर अन्याय होत असून, या चुकीच्या कार्यपद्धतीने कंत्राटी कर्मचारी यांचे आयुष्य उद्ध्वस्त असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.