कळवण : निर्यातबंदीचा निर्णय आणि कळवण बाजार समितीत सोवमारी लिलाव बंद असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी बसस्थानक परिसरात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रास्ता रोको केला. यावेळी कांदा निर्यात बंदी उठवावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार बी. ए. कापसे यांना देण्यात आले. सोमवारी सकाळी नाकोडा येथील कांदा मार्केट यार्डात ४२५ ट्रॅक्टर कांद्याची अवाक झाली. सर्व व्यापारी जिल्हा असोसिएशनची बैठक असल्याने चांदवड येथे गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळी साडे अकरा वाजता बसस्थानक परिसरात आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, जि. प. चे माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे, शिवसेनेचे विभाग प्रमुख शीतलकुमार अहिरे, किसान सभा सेक्रेटरी मोहन जाधव, बाजार समिती संचालक हरिभाऊ पगार उपस्थित होते.
केंद्राने निर्यात बंदी करून रडीचा डाव खेळला आहे. गेल्या वर्षी भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना कांदा उकिरड्यावर फेकावा लागला. आता दोन पैसे मिळत असताना निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
--महेंद्र हिरे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस
कांद्यामुळे शेतकऱ्याच्या घरात दिवाळी साजरी झाली असती. मात्र निर्यात बंदीमुळे सारे स्वप्न भंगले. कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी अन्यथा शेतकरी पेटून उठेल.
--देवीदास पवार, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघटना